मशिदीबद्दलच्या ‘त्या’ विधानावरून विरोधकांचा योगींवर निशाणा, म्हणाले..

अयोध्या : वृत्तसंस्था – राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर, कोरोना आणि अयोध्येत मशिदीचे बांधकाम आदी विषयांवर चर्चा केली. मशिदीच्या पायाभरणीसंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मला कोणी बोलवणार नाही आणि मी जाणारही नाही, जर मी त्या ठिकाणी गेलो तर अनेकांच्या दुकानांना टाळं लागेल, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता मशिदीच्या पायाभरणीच्या विधानावरून विरोधकांनी योंगीवर निशाणा साधला आहे. योगी आदित्यनाथ यांनी माफी मागावी अशी मागणी करत हल्लाबोल केला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी माफी मागावी अशी मागणी समाजवादी पक्षाकडून करण्यात आली आहे. या प्रकारचं वक्तव्य करून योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदासाठी घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे. ते केवळ हिंदूंचे नाही तर संपूर्ण मुख्यमंत्री आहेत. राज्यात हिंदू आणि मुस्लिमांची जेवढीही लोकसंख्या असेल तेवढ्या लोकसंख्येचे ते मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या वक्तव्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे प्रवक्ते पवन पांडेय यांनी केली.

काँग्रेसचे माध्यम संयोजक लल्लन कुमार यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी मशिदीच्या केलेल्या विधानावर आम्हाला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. राजीव गांधी हे अयोध्येला गेले होते आणि त्यांनी राम मंदिराच टाळं उघडलं हे मुख्यमंत्र्यांना माहीत हवं. ते हिंदुत्त्वाचं राजकारण करत आहेत आणि काँग्रेस कायम लोकांच्या भल्यासाठी काम करत आहे. प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत. मात्र, ते फक्त भाजपचे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न पक्षाकडून होत आहे आणि तो त्यांचा गैरसमज असल्याचे लल्लन यांन म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.