विरोधक सर्वसामान्य व्यक्तींचा बुध्दिभ्रम करण्याचा प्रयत्न करत आहेत : मेधा कुलकर्णी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विरोधी पक्षातील मंडळी सर्वसामान्य व्यक्तींचा बुद्धीभ्रम करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु जनता सुज्ञ आहे शिवाय ती योग्य ती भूमिका घेईल असे वक्तव्य आमदार मेधा कुलकर्णी यांनी केले आहे. इतकेच नाही तर, मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे काळ्या पैशांवर भिस्त असलेल्या लोकांच्या शेपटीवर पाय ठेवला गेला असेही ते म्हणाले. याशिवाय, सर्वसामान्य लोकांना जाणवलेला नोटांचा तुटवडा तात्पुरत्या स्वरूपाचा होता. परंतु आजही नोटबंदीमुळे अडचणी आलेले राजकारणातील मातब्बर शंखनाद करत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

कविता रसिक मंडळीतर्फे ‘एका संघषार्ची यशोगाथा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कर्यक्रमात मेधा कुलकर्णी यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. या कार्यक्रमात करमचे भूषण कटककर, ज्येष्ठ कवयित्री मृणालिनी कानिटकर-जोशी आणि भूषण कटककर यांनी मेधा कुलकर्णी यांचा कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक प्रवास उलगडवून दाखवला. त्यांनी अनेक प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली. महिला सुरक्षितता, भाजप सरकारमधील वरिष्ठ पदाधिका-यांबरोबर वावरण्याचा अनुभवही त्यांनी शेअर केला. यावेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आडकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे, असा आरोप भाजप सरकारवर लावला जातो. आणीबाणीच्या माध्यमातून आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणत्या सरकारने केला होता, याचे आत्मपरिक्षण करून दांभिकता थांबवावी. माझ्या राजकीय वाटचालीदरम्यान कुटुंबातील सदस्यांपासून माझ्यापर्यंत सगळ्यांनीच आपापल्या पातळीवर संघर्ष केला आहे. मी कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकले नाही, तरी क्वालिटी टाईम देण्याचा प्रयत्न केला.”

पुढे बोलताना त्या असेही म्हणाल्या की, “जे शिक्षण अध्ययन-अध्यापकाच्या पलीकडे जाऊन अभिवृत्तीत परावर्तित होते, ते खरे शिक्षण होय. तुम्ही डॉक्टर झाला असूनही कौमार्य चाचणीचा आग्रह धरत असाल तर तुमचे वैद्यकीय शिक्षण फोल ठरते. अलीकडचे शिक्षण हे गुणांभोवतीच गुंफलेले असल्याने विद्यार्थ्यांची भावनिक जडणघडण होत नाही. विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढेल, पण त्याचबरोबरीने सामाजिक आणि भावनिक संवेदना तितक्याच विकसीत होणे आवश्यक आहे” असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान या कार्यक्रमात वर्षा हळबे यांना ‘पुरस्कार’ या कवितेसाठी ऑनलाईन काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा कुलकर्णी यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिन्मय चिटणीस यांनी केले. सुप्रिया जाधव यांनी आभार मानले.