आमचा अंत न पाहता धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा…

मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जातीचा दाखला द्यावा या मागणीसाठी गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूवी आंदोलन केले होते. परंतु. धनगर समाजाचा प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित आहे. धनगर समाजाचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसुचित जमातीत केला आहे. मात्र 70 वर्षापासून त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता केंद्राने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू, नये असा इशारा धनगर समाजाचे नेते अ‍ॅड दिलीप एडतकर यांनी दिला आहे. राज्यात एकीकडे मराठा समाजाचे आंदोलन पेटले असतानाच आता धनगर समाजही आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाला न्याय द्यावा, अन्यथा चौकाचौकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळू, केंद्रीय मंत्र्यांचे पुतळे जाळू, त्यांच्या घरात मेंढरे सोडू, खासदार आणि मंत्र्यांच्या घरासमोर घंटानाद करु. बहिर्‍या सरकारने कान कसे उघडतील याची दक्षता घ्यावी. आमचा अंत न पाहता धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, नाहीतर नरेंद्र मोदी सरकारचा अंत जास्त दूर नाही एवढं लक्षात ठेवावं असा इशारा धनगर समाजाने दिला आहे.

अ‍ॅड. एडतरकर यांनी म्हटले की, गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाचा प्रश्न कायम आहे. समाजाने विविध आंदोलने करून सरकार समोर प्रश्न मांडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र आश्वासनेच मिळाली. समजाची सातत्याने निराशा होत आहे. धनगर समाज अस्वस्थ असल्याने सध्याची आंदोलन होत आहेत. सरकारने धनगर समाजाच्या भावनांचा आदर करून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा यांसह विविध मागण्यांसाठी सर्वत्र ’ढोल बजाव’ आंदोलन करण्यात आले. दरम्यान, बारामतीमध्ये धनगर समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या माळेगाव येथील गोविंदबाग निवासस्थानासमोर शुक्रवारी ’ढोल बजाव’ आंदोलन केले होते.