३०० कोटी द्या नाहीतर, गाडीला आडवे झोपू

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – महापालिकेच्या निवडणुकीत जाहीर प्रचारसभेत बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी भाजपचा महापौर केला आणि भाजपला सत्ता दिली तर आम्ही 300 कोटी रुपयांचा भरीव निधी नगर शहराच्या विकासासाठी देऊ असे आश्वासन दिले होते. शुक्रवारी दानवे नगर दौऱ्यावर येत आहेत. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तातडीने 300 कोटी रुपये निधी महापालिकेकडे वर्ग करण्याचे पत्र द्यावे. नाहीतर 4 जानेवारी रोजी रावसाहेब दानवे यांच्या गाडीसमोर आडवे पडून त्यांना नगर शहर बंद आंदोलन करण्यात येईल, असे खणखणीत पत्र आमदार बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाकडून देण्यात आले आहे.

रावसाहेब दानवे हे 4 जानेवारी रोजी नगर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीआधी दिलेले आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी यांनी पक्षाच्या अधिकृत लेटर हेडवरून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपच्या नगरसेवकांनी कोणात्याही कारवाईची चिंता न करता, निष्पक्षपणे तुम्हाला पाठिंबा दिला आहे.

नगरकरांनी भाजपचा महापौर निवडून देत भाजपला सत्ता दिली आहे. तेव्हा आता तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि नगरच्या विकासासाठी 300 कोटी रुपयांचा निधी द्या, अशी मागणी या पत्रातून केली आहे. आता मुख्यमंत्री आणि रावसाहेब दानवे काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.