नवी दिल्ली : वृत्तसंस्था-इंधन दरात होणाऱ्या चढ उतारामुळे आधीच जनता त्रस्त होत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. अशातच आता गॅस कनेक्शनला घेऊन नवीन नियम सरकारने काढला आहे. महत्त्वाचं म्हणजे या नियमाची पूर्तता केली नाही तर तुमचं गॅस कनेक्शनही रद्द होऊ शकतं. त्यामुळे ही सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ज्यानं आपलं केवायसी अपडेट केलेलं नाही, त्यांचं गॅस कनेक्शन रद्द करण्यात येणार आहे. यात जास्त करून दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील लोकांचा समावेश आहे.
येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांना केवायसी पूर्ण करण्यास गरजेचे आहे. भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडेन गॅस या कंपन्यांनी तसे सांगितले आहे. परंतु अजूनही अनेक ग्राहकांनी केवायसी पूर्ण केलेलं नाही असं दिसत आहे. महत्त्वाची बाब अशी की, ज्यांनी केवायसी पूर्ण केलेली नसेल त्यांचं कनेक्शन रद्द करण्यात येणार आहे. म्हणूनच केवायसी पूर्ण करून गॅस कनेक्शनसाठी पात्र असलेल्या ग्राहकांना त्वरीत गॅस कनेक्शन मिळणार आहे.
ही कागदपत्रे आहेत गरजेची
आयओसी वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला केवायसीसाठी आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, लीज अॅग्रीमेंट, व्होटर आयडी, टेलिफोन/इलेक्ट्रिसिटी/वॉटर बिल, पासपोर्ट, रेशन कार्ड, फ्लॅट अलॉटमेंट आणि पजेशन लेटर, हाऊस रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट, एलआयसी पॉलिसी, बँक/ क्रेडिट कार्डाचं स्टेटमेंट द्यावं लागणार आहे. तसेच आयडी प्रूफसाठी आधार नंबर, पॅन कार्ड नंबर, व्होटर आयडी नंबर, ऑफिस आयडी कार्ड(राज्य आणि केंद्र सरकारद्वारे), ड्रायव्हिंग लायसन्स द्यावे लागणार आहे.