‘कोरोना’त एक कोटी मजुरांची पायी वारी ! मार्च ते जूनदरम्यान पायी घर गाठले

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना महामारीत लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले. उपजिविकेसाठी विविध राज्यामध्ये असणार्‍या मजुरांनी लॉकडाऊननंतर स्वगृही परतण्यास सुरुवात केली. मात्र वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने असंख्य मजुरांना रस्त्यावर उतरत पायी घर गाठले. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मार्च ते जूनदरम्यान 1 कोटीहून अधिक मजुरांनी आपआपल्या राज्यात पायी स्थलांतर केल्याची माहिती सरकारने लोकसभेत लिखीत स्वरुपात दिली आहे.

रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की, कोरोना महामारीत मोठ्या प्रमाणावर मजूरांनी एका राज्यातून दुसर्‍या राज्यात स्थलांतर केले आहे .कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जवळापास 1.06 कोटी मजुरांनी स्थलांतर केले. त्यामध्ये पायी प्रवास केलेल्या मजुरांचाही समावेश आहे. उपलब्ध माहितीनुसार मार्च-जून 2020 दरम्यान 81 हजार 385 रस्ते अपघात झाले. यामध्ये जखमींचा आकडा 29 हजार 415 आहे. मात्र स्थलांतरादरम्यान रस्ते अपघातात मरण पावलेल्या मजुरांसंदर्भात मंत्रालयाने स्वतंत्र डेटा ठेवलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.