Coronavirus Impact : ‘कोरोना’सह आता ‘हे’ मोठं आव्हान, अजित पवारांचे सुतोवाच

मुंबई : पोलीसनाम ऑनलाईन : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला आणखी काही दिवस घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले कि, आजच्या घडीला कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोन महत्वाची आव्हान राज्यासमोर आहेत. त्यामुळे नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आपण लवकरात लवकर या आव्हानांवर मात करु शकतो, असे अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री नऊ वाजता दिवे लावण्याचे आवाहन केले आहे, याला प्रतिसाद देताना कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये आणि गर्दी टाळावी, असही आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत साडे सहाशेपर्यंत झालेली वाढ थांबवणं त्याचप्रमाणे दररोज होणारे मृत्यू रोखणं, आरोग्य, पोलिस, अन्य यंत्रणांवरील ताण कमी करणं, लॉकडाऊनमूळ ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही सध्या आपल्या सर्वांसमोरची आव्हानं आहेत. त्यामुळे या आव्हानांवर मात करण्यासाठी नागरिकांनी संयम व शिस्त पाळणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रसार सर्वत्र झाला आहे. तुमचं कर्तव्य आहे कि, त्याला स्वत:च्या घरात न आणणं, स्वत:ला, कुटुंबाला त्याची लागण होऊ न देणं. आणखी काही दिवस संयम पळत घराबाहेर पडणं टाळलं तर, कोरोना नक्कीच आटोक्यात येऊ शकेल, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच आरोग्य, पोलिस, अन्न व नागरी पुरवठा व सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी ध्येयनिष्ठेनं काम करत असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री नऊ वाजता दारात, खिडक्यात दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. रस्तावर उतरुन गर्दी करणं टाळावं. सॅनिटायझरने हात स्वच्छ करून दिव्याजवळ जाऊ नये, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने सावध राहण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.