जम्मू : PAK Firing News | पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने गुरुवारी रात्री ड्रोन, मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय एलओसीवर सातत्याने गोळीबार केला. पुंछ भागात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात दोन निरागस बहीण आणि भाऊ यांचा जीव गेला आहे. पाकिस्तानने नागरी वस्तीत केलेल्या गोळीबारात १६ भारतीयांचा मृत्यू झाला.
अधिक माहितीनुसार, बुधवारी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात १६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात दोन निरागस बहीण आणि भाऊ यांचा जीव गेला आहे. ही भावंडे एकाचवेळी जन्माला आली. एकत्रच वाढली आणि आता दोघांनी एकत्रच या जगाचा निरोप घेतला. ही भावंडे फक्त १२ वर्षांची होती. झोया आणि जैन अशी या मृत भावंडांची नावे आहेत. या दोघांच्या मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले. या घटनेने झोया आणि झैनची आई अरुसा खान यांच्या जीवनात अंधार पसरला आहे.
झोया आणि झैनला चांगले शिक्षण आणि आयुष्य मिळावे यासाठी ते आपले मूळ गाव कलानी चकथरूहून पुंछ शहरात आले. मात्र पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात या मुलांचा बळी गेला. भारत-पाकिस्तानमधील शत्रुत्वाने एक हसतं खेळतं कुटुंब उद्ध्वस्त केले आहे. एका बाजूला अरुसा आपल्या मुलांना गमावल्याचे दुःख सहन करत आहे तर दुसऱ्या बाजूला पती रमीझ खान यांची वैद्यकीय महाविद्यालयात जगण्यासाठी झुंज सुरू आहे.