LOC वर भारतीय सैन्याकडून ‘चोख’ प्रत्युत्तर, पाकच्या चौक्या ‘उध्वस्त’ तर अनेक सैनिक ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीमेपलीकडून पाकिस्तान सतत गोळीबार करीत आहे. आज पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला, ज्यास भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीरमधील कृष्णा खोरे, मेंढर सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या अनेक चौक्या नष्ट केल्या. तसेच पाकिस्तानी सैनिकांना देखील कंठस्नान घातले.

तत्पूर्वी नौसेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नायक रविरंजन कुमार सिंह शहीद झाले. रविरंजन कुमार सिंग (वय ३६) हे बिहारचे असून ते गोपा बिघा गावचे रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी रीता देवी आणि इतर सदस्य आहेत.

काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तान हादरला असून त्यामुळे भारत-पाक सीमेवरील कारवायांना ऊत आला आहे. मागील अनेक दिवसांपासून तसेच सोमवारीही पाकिस्तानने नौशेरा सेक्टरमध्ये मोर्टार डागले होते.

भारतीय सेना जोरदार प्रत्युत्तर देत आहे :
भारतीय लष्कर सीमेवरच्या पाकिस्तानच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देत आहे. अलीकडे जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केले. त्याच वेळी भारतीय सैन्याने त्याला देखील योग्य प्रत्युत्तर दिले आणि राजौरी सेक्टरमध्ये पाक सैन्याची एक चौकी उडवली. लष्कराशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन झाल्यानंतर भारताकडून प्रत्युत्तरादाखल योग्य कारवाई केली गेली. यावेळी भारतीय लष्कराने राजौरी येथे एक पाकिस्तानी सैन्याची एक चौकी उडवली. मात्र, नौशेरा येथे पाक गोळीबारात एक भारतीय जवान शहिद झाला.

मागील अनेक दिवसांपासून पाककडून युद्धबंदीचे उल्लंघन :
गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याने युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. १५ ऑगस्टच्या दिवशी पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या पुंछ येथील केजी सेक्टरमधील युद्धबंदीचे उल्लंघन केले. याशिवाय उरी आणि राजौरी येथेही पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले होते. भारतीय सैन्याने यास योग्य प्रत्युत्तर दिले आणि त्याने तीन पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले. त्यानंतर देखील १७ ऑगस्टला सकाळी पाक सैन्याने जम्मू विभागातील राजौरी जिल्ह्यातील नौसेरा तहसीलच्या कलाल सेक्टर आणि पूंचच्या मानकोट सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार केला. यात पाकिस्तानी लष्कराचे दोन अधिकारी आणि पाच सैनिक ठार झाले तसेच ३ चौक्याही नष्ट केल्या गेल्या.

आरोग्यविषयक वृत्त