भारतापासून आपण वाचलो, पाकिस्तानी PM इमरान खान यांनी संसदेत सांगितलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी संसदेत भाषण करताना भारतावर निराधार आरोप केले आहेत. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान म्हणाले आहेत की मंगळवारी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात आहे यात शंका नाही. 2008 च्या मुंबई हल्ल्याचा संदर्भ देताना पाकिस्तानी पंतप्रधान म्हणाले, ‘जे मुंबईत घडले, ते त्यांना पुन्हा कराचीमध्ये करायचे होते. त्यांना अनिश्चितता पसरवायची होती. अर्थात हे काम भारताचे आहे.’

इमरान खान यांनी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस उपनिरीक्षक आणि तीन सुरक्षा रक्षकांना पाकिस्तानचे नायक म्हणून वर्णन केले. इमरानने कोणतेही कारण न करता भारतावर आरोप ठेवत म्हटले की, ‘भारताने आम्हाला अस्थिर करण्याचा विचार केला होता पण सैनिकांनी बलिदान दिले आणि मोठ्या अनर्थातून वाचवले.’ तसेच इमरान खान म्हणाले की, ‘माझ्या कॅबिनेट आणि मंत्र्यांना माहिती आहे की सर्व एजन्सी हाय अलर्टवर होती. आमच्या एजन्सींनी किमान चार दहशतवादी हल्ल्यांच्या प्रयत्नांना अपयशी केले आहे, त्यापैकी दोन इस्लामाबादमध्येच घडवण्याचे नियोजन होते. आम्ही पूर्णपणे सज्ज होतो…हा आमचा एक मोठा विजय होता.’

दहशतवाद्यांनी सोमवारी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज (पीएसई) इमारतीत हल्ला करत पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची येथे दहशत निर्माण केली होती. या हल्ल्यात चार दहशतवाद्यांसह 11 जण ठार झाले. यात 4 सुरक्षा रक्षक, एक पोलिस अधिकारी आणि 2 नागरिकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात सामील झालेले चार दहशतवादीही ठार झाले.

बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) सोशल मीडियाच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तथापि, पाकिस्तान सतत भारतावर खोटे आरोप करीत आहे. या हल्ल्यानंतर निमलष्करी रेंजर्स चीफ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, पाकिस्तानच्या आर्थिक राजधानीत शांतता पाहून भारतीय गुप्तचर संस्था रॉ अस्वस्थ झाली आहे. कोणत्याही परदेशी एजन्सीच्या मदतीशिवाय असा हल्ला करता येणार नाही. यापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनीही भारतावर असे आरोप केले होते. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले होते की या हल्ल्यामागे भारताचा हात आहे आणि भारत पाकिस्तानमध्ये शांतता पाहू शकत नाही.

पाकिस्तानकडून येणाऱ्या अशा विधानांसंदर्भात भारतानेही प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी अशा वक्तव्यांना मूर्खपणा असल्याचे सांगत म्हटले की पाकिस्तान सारख्याच नाही तर जगातील प्रत्येक दहशतवादी हल्ल्याचा भारत निषेध करतो. त्यात कराची हल्लाही समाविष्ट आहे. यात भारताला कसलाही संकोच नाही. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, पाकिस्तान आपल्या घरगुती समस्यांची जबाबदारी भारताच्या माथी फोडू शकत नाही.

भारताने प्रत्युत्तर देताना प्रश्न उपस्थित केला की, काय पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी आपले सरकार आणि आपल्या पंतप्रधानांच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देऊ शकतील ज्यात त्यांनी एका जागतिक दहशतवाद्याला ‘शहीद’ असे म्हटले होते. वास्तविक पाहता पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत भाषण करताना अल कायदाचा नेता ओसामा बिन लादेनला शहीद घोषित केले होते.