भारत लडाखमध्ये सर्जिकल स्ट्राइक का करत नाही ? पाकिस्तानचा सवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी जुबानी युद्धात भारताविरोधात प्रत्युत्तर दिले आहे. कुरेशी यांनी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना प्रश्न विचारला आहे की, लडाखबद्दल त्यांचे काय मत आहे? भारत लडाखवर सर्जिकल स्ट्राइक का करत नाही? काही दिवसांपूर्वी लडाख प्रदेशात भारत-चीन सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले की- ‘मला अमित शहा यांना हे स्पष्ट करून सांगायचे आहे की, जर भारताने (पाकिस्तानवर) हल्ला करण्याची चूक केली तर आम्ही त्यास योग्य उत्तर देऊ. भारताने हल्ला केल्यास ताबडतोब कारवाई केली जाईल. सोमवारी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शाह महमूद कुरेशी म्हणाले की, भारताने रिकाम्या धमक्या देणे थांबवावे. अमित शहा यांचे विधान बेजबाबदार असून जगानेही ते पाहिले पाहिजे असे ते म्हणाले.

जिओ.टीव्हीच्या अहवालानुसार, कुरेशी यांनी असेही म्हटले आहे की- ‘पाकिस्तानवर एअरस्ट्राईकची चूक भारताने करू नये कारण इस्लामाबादला आपला बचाव कसा करावा हे माहित आहे.’ कुरेशी यांनी भारताला दोष देत म्हटले की- ‘पाकिस्तानने नेहमीच शांततेविषयी चर्चा केली आहे. पण भारत निरपराध लोकांच्या जीवाशी खेळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात असलेल्या सरकारवर अल्पसंख्यांक असमाधानी आहेत, पण भारतीय जनता पक्ष आपले अपयश लपविल्यासाठी पाकिस्तानला दोष देण्याचा प्रयत्न करीत आहे.

कुरेशी म्हणाले की, ‘भारताची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. काश्मीरमध्ये भारताचा अत्याचार शिगेला पोहोचला आहे. भारताला अफगाण शांतता चर्चेला नुकसान पोहचवायचे आहे. ” काही दिवसांपूर्वी भारत-चीन सीमेवर लडाख प्रदेशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. तथापि, आता दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.