पाकिस्तानच्या हल्ल्यात जवान शहीद, चार नागरीक ठार, १२ जखमी

वृत्तसंस्था :
जम्मू यथील भारतीय सैन्याच्या चौक्या आणि सीमारेषेवरील गावावर आज पाकिस्तानी रेंजर्सनी तुफान गोळीबार आणि तोफगोळ्यांचा वर्षाव केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात चार नागरिकांचा मृत्यू झाला असून एक बीएसएफ चा जवान शहीद झाला आहे. तसेच या हल्ल्यात १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

पाकिस्तानी सीमेपलीकडून सलग तिसऱ्या दिवशी हा हल्ला करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर येत आहेत. आरएस पूरा, बिशनाह आणि अर्णिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून मॉर्टर हल्ला आणि गोळीबार करण्यात आला असे बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

जम्मू-काश्मीरच्या आर. एस. पुरा सेक्टर या भागात शुक्रवारी पहाटे पाकिस्तानी रेंजर्सकडून अचानक गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, कारवाईदरम्यान एका बीएसएफ जवानाला सर्वोच्च बलिदान द्यावे लागले. त्याचबरोबर दोन नागरिक यात जखमी झाले असून आंतरराष्ट्रीय सीमेच्या ३ किमीच्या त्रिज्येच्या परिसरातील शाळांना स्थानिक प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.