पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pakistanis In Pune | पहलगाम येथे दहशती हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून परत जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. पुण्यात तब्बल १११ पाकिस्तानी नागरिक सध्या आलेले असून त्यापैकी ९१ पाकिस्तानी दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आले आहेत. त्यापैकी तिघा जणांनी आतापर्यंत भारत देश सोडला असल्याचे पुणे शहर पोलीस दलातील परकीय नागरिक विभागाकडून सांगण्यात आले.
पाकिस्तानी नागरिक प्रामुख्याने नातेवाईकांकडे तसेच वैद्यकीय कारणासाठी दीर्घ मुदतीवर भारतात येत असतात. पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारमध्ये २६ पर्यटकांचा मृत्यु झाला. या दहशतवादी हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. अटारी -वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तत्काळ बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. तिथून प्रवेश केलेल्या पाकिस्तानी नागरिकांना १ मे पर्यंत मायदेशात परत जाता येईल, असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे.
परदेशातून आलेल्या कोणत्याही नागरिकांना ते ज्या शहरात जातात, तेथील जवळच्या पोलीस आयुक्तालय किंवा अधीक्षक कार्यालयात नोंद करावी लागते. तसेच एका शहरातून दुसर्या शहरात जायचे असेल तरी तशी नोंद करावी लागते. याशिवाय वेळोवेळी पोलिसांकडून परदेशी नागरिक त्यांनी दिलेल्या पत्त्यावर वास्तव करीत आहेत ना. ज्या कारणासाठी ते आले आहे, त्या व्यतिरिक्त इतर काही करत नाहीत ना, याची तपासणी केली जाते.
पुण्यात आलेल्या १११ पाकिस्तानी नागरिकांपैकी बहुतांश नागरिक दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले आहेत. दीर्घ मुदतीचा व्हिसा हा पाच वर्षांसाठी दिला जातो तर व्हिजिटर व्हिसा ९० दिवसांसाठी दिला जातो. भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी ३५ पुरुष आणि ५६ महिला या दीर्घ मुदतीच्या व्हिसावर भारतात आले आहेत. तर २० पाकिस्तानी व्हिजिटर व्हिसावर आले आहेत.
केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडून जाण्याचे आदेश दिले असले तरी याबाबत अद्याप परराष्ट्र विभाग आणि मुंबई परकीय नागरिक विभागाकडून कोणतीही माहिती आलेली नाही, असे पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक विभागाकडून सांगण्यात आले.
पुण्यातील पाकिस्तानी नागरिक
दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले – ३५ पुरुष, ५६ महिला
व्हिजिटर व्हिसावर आलेले – २० नागरिक