नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानने F-16 हे विमान घेऊन भारतात घुसखोरी केली. पाकच्या या विमानाला परतवून लावताना भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वार्थमान यांचे मिग -२१ हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन क्रॅश झाले. त्यानंतर अभिनंदन यांना पाकिस्तनातून भारताला सोपवण्यात देखील आले मात्र आता पाकिस्तानच्या वनविभागाने मात्र अभिनंदन यांच्यावर एफआयआर दाखल केली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात बॉम्ब हल्ले केल्याप्रकरणी अभिनंदनवर पाकिस्तानच्या वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तसेच भारतीय विमानांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात पाकिस्तानमधील 19 वृक्षांचे नुकसान झाल्याचा दावा येथील वन विभागाने एफआयआरमध्ये केला आहे.
विशेष म्हणजे पाकने संयुक्त राष्ट्रांकडे भारताविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत भारतीय हवाई दलाने पाकमधील वृक्ष उध्वस्त करीत पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारमधील मंत्री मलिक अमीन असलम यांनी गेल्या आठवड्यात रॉयटर्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भारतीय हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात कित्येक डझन झाडांची पडझड झाली व पर्यावरणास नुकसान झाल्याचे म्हटले होते.
भारताच्या हवाई दलाने बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राईक करत शेकडो दहशतवाद्यांना ठार केले. मात्र भारताच्या हवाई दलाने जैशच्या तळांवर नाही तर जंगलात हवाई हल्ले केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.