राहुल गांधींना बॉम्बला बांधून पाठवायचं होतं : पंकजा मुंडे

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे काय मागता, त्यापेक्षा एखाद्या बॉम्बला बांधून राहुल गांधींना पाठवायचं होत. मग खरं काय ते तुम्हाला कळाल असत, अशी टीका महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. विरोधक सातत्याने भारतीय वायु सेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागत आहे. यावरून पंकजा मुंडेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जालन्यातल्या जामखेड येथे सभेच आयोजन करण्यात आले होते, पंकजा मुंडे या सभेला संबोधित करत होत्या. हल्ली कोणीही उठत आणि पंतप्रधानांविषयी बोलू लागलेय. वृत्तपत्राची हेडलाईन होण्यासाठी मोदींवर काहीही बोलू लागले आहेत. आमच्या जिल्ह्यातले लोक नेते मोदींवर टीका करू लागले आहेत. मोदी या लोकांना ओळखत देखील नाहीत, तरी देखील हे लोक मोदींविषयी बोलू लागले आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, लोकल नेते, कार्यकर्ते मोदींकडे सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. किती लोक गेले, कोण-कोण मेले याचा जाब विचारत आहेत. या लोकांचा भारतीय सैन्यावर विश्वास नाही. असे प्रश्न विचारणाऱ्यांना दुसऱ्या देशात नेऊन सोडले पाहिजे, मग त्यांना कळेल कुठे झाला सर्जिकल स्ट्राईक. या लोकांनी राजकारण खालच्या पाळीवर नेल असल्याचा आरोपी देखील त्यांनी यावेळी केला.