पंकजा मुंडेंनी मंत्रीपदाला लाथ मारून बाहेर पडायला हवे होते

पाथर्डी : पोलीसनामा ऑनलाईन – २०१४ साली झालेल्या निवडणुकीत भाजपाने ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा एका आंतरराष्ट्रीय हॅकरने केला. विशेष म्हणजे भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याहत्येमागे देखील ईव्हीएम हॅकिंगचा असल्याचा आरोप देखील या हॅकर ने केला आहे. हॅकरच्या या गौप्यस्फोटानंतर एकच खळबळ माजली आहे. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी देखील अनेक राजकीय पक्षांनकडून करण्यात आली. आता ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची मुलगी भाजपा सरकारच्या मंत्रीमंडळात आहे. त्यांनी वडिलांची हत्या झाल्याचे कळल्यावर मंत्रीपदाला लाथ मारून बाहेर पडायला हवे होते’. अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी केली आहे. पाथर्डी येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

मुंडेंच्या हत्येची चौकशी करणार : जयंत पाटील

यावेळी बोलताना पाटील म्हणाले. गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली हे सांगितले जात आहे. त्यांचा मृत्यू कसा झाला याची चौकशी झाली पाहिजे. दिल्लीत झालेल्या अपघातात चालकाची चूक होती तर त्याला शिक्षा का झाली नाही. की तो अपघात घडवण्यात आला याबद्दल संशय व्यक्त होत आहे असे सांगतानाच राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर त्यांच्या मृत्यूची चौकशी करणार असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं आहे. तुम्हाला फसवणारी टोळी दिल्लीत आणि राज्यात आली आहे आणि हीच टोळी घालवण्याचे काम आपल्याला करायचे आहे असं आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी केलं.

मी हॅकर नाही,कन्या आहे: पंकजा मुंडे

दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या हत्येबाबत पंकजा मुंडे यांनी “यावर काय बोलावं हा प्रश्न आहे. मी हॅकर नाही. एक कन्या आहे. या सगळ्या गोष्टींचं राजकीय भांडवलं मला करायचं नाही. या सगळ्या प्रकरणामुळे मानसिक त्रासातून कुटुंबियांना जावं लागत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह यांना मी स्वतः सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. ती पूर्ण झाली आहे”. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली होती.