कौमार्य चाचणी प्रकरण : पीडित तरुणीनेच तक्रार द्यावी, महिला सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी
पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- ( प्रेरणा परब – खोत ) – पुण्यात उच्च शिक्षित वधूची कौमार्य चाचणी घेण्यात आली. या घटनेमुळे विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात एकाच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे या घटनेत वधू आणि वर दोन्ही पक्षातील मंडळी सुशिक्षित आहेत एवढेच काय या प्रकरणात वराचे वडील पुण्याचे माजी नगरसेवक आहेत तर वधूचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत.
जर उच्च शिक्षित वर्गात ही परिस्थिती आहे तर कंजारभाट समाजातील सामान्य व्यक्तीचं काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकाराच्या कलाम १५ नुसार नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारे भेदभाव नसावा. असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र ही कौमार्य चाचणीची प्रथा म्हणजे संविधानाचे सरळ सरळ उल्लंघन आहे असेच म्हणावे लागेल. या क्रूर चाचणी कौमार्य विरोधात न्यायालयात ठोस कायदा केला जावा अशी मागणी केली जात आहे. याशिवाय पुण्यातील या केस मधील व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
या प्रकरणाबाबत “पोलिसनामा’ ने काही व्यक्तींशी संवाद साधला असता वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या. या कौमार्य चाचणीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या प्रियांका….स्वतः कंजारभाट समाजाच्या आहेत पण त्यांनी या कुप्रथेविरोधात आवाज उठवला आहे. Stop The V Ritual’ या चळवळीद्वारे त्या काम करीत आहेत. यांच्याशी बातचीत केली असता त्या म्हणाल्या “मुळात ही प्रथा समाज फार पुढे गेला असला तरी बंद झालेली नाहीच.
माल खरा निघाला तर समाधान ,समाधान, समाधान असे तीनवेळा बोलण्यात येते अशी पद्धत आता सुरु केली आहे. हा सुशिक्षित घरात हा घडतो आहे हे काही नवीन नाही. सुशिक्षित असून देखील हे प्रकार पूर्वीपासून चालूच आहेत. या समाजातील काही तरुण तरुणी आजही त्यांच्या घरच्यांच्या आधीनच आहेत. जरी त्यांना ही प्रथा चौकीची आहे तरी ते स्वतःच ऐकत नाहीत ते घरच्यांचेच ऐकतात. एवढेच नाही तर जात पंचायतीला या बाबतीत विचारले असता ते सरळ सरळ खोटे बोलतात. किंवा नकार देतात.
जातपंचायत कायदा लागू झाला असला तरी कायद्याची अंमलबजावणीत त्रुटी उदभवत असल्याची शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील कौमार्य चाचणी करण्यात आलेल्या घटनेबाबत खंत व्यक्त केली आहे. पुणे येथे नवविवाहित मुलीला जात पंचायतीच्या पंचांनी कौमार्य चाचणी करण्याची आदेश दिले. त्यानुसार पीडित मुलीला या घटनेला सामोरे जावे लागले आहे. जातपंचायत विरोधी कायदा विधिमंडळात मंजूरीसाठी आ.डॉ.नीलम गोऱ्हे प्रयत्न केले होते. या कायद्या अंतर्गत कौमार्य चाचणी करणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु कायदा झाला असलातरी देखील अंमलबजावणी मध्ये त्रुटी असल्याची खंत आ.डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली.