आजोबांनी फटकारल्यानंतर पार्थ मोठा निर्णय घेण्याची शक्यता, भाजपाचं ‘ऑपरेशन लोटस’ पवारांच्या घरातून ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आता राष्ट्रवादी पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यासाठी पार्थ पवार याबाबत मोठा निर्णय घेणार असल्याचे समजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केली होती. नुकतंच खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत पार्थ पवारबद्दल अनेक चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे पार्थ पवार वेगळा मार्ग निवडणार का?, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. आजोबांविरोधात नातू मोठा निर्णय घेणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

तर, महाराष्ट्रात भाजपचे लोटस ऑपरेशन सुरु?
राजस्थाननंतर आता भाजप महाराष्ट्राकडे मोर्चा वळवून ‘लोटस ऑपरेशन’ सुरू करणार का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होत आहे. भाजप अगोदरपासून महाराष्ट्रावर डोळा ठेवून आहे. काहीही करून महाराष्ट्रात सत्ता मिळवायची, असा हेतू असल्याचे समजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघालंय. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर अपरिपक्व आहे असे म्हंटलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीतील शरद पवार आणि अजित पवार हे दोन नेते समोरासमोर येण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे. यावर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पार्थ पवार कोणताही निर्णय आपल्या वडिलांना विचारल्याशिवाय घेणार नाही. तर, दुसरीकडे नारायण राणे कुटुंबाने पार्थ पवार यांची पाठराखण केलीय. त्यामुळे भाजपकडून ऑपरेशन लोटस हे महाराष्ट्रात सक्रीय झालंय, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागलीय.

पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे सध्या मोठा निर्णय घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. पार्थ पवार यांचा प्रसारमाध्यमांसमोर अपमान झाला म्हणून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतील, असेही मत काही काही राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत. पार्थ पवार यांना पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा आग्रह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा होता. पण, त्यालाही शरद पवार यांनी विरोध केलाय. पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी देता येणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलीय. त्यावरुन हा वाद निर्माण झाला आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह रजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण, जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे काही कारण नाही. पार्थ पवार म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचे नाही.

पार्थ पवार यांची पहिली भूमिका
पार्थ पवार यांनी 27 जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी केली होती. ही संपूर्ण देशासह तरुणांची भावना आहे, असेही ट्वीट पार्थ पवार यांनी भेटीनंतर केले होते.

पार्थ पवार यांची दुसरी भूमिका
आम्ही कोरोना विषाणूशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत. पण, मंदिर बांधून कोरोना जाईल, असे काही जणांना वाटतं, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. मात्र, त्यानंतर पार्थ पवार यांनी भूमिपूजनाच्या दिवशी ‘जय श्रीराम’चा नारा देत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

पार्थ पवार यांचा थोडक्यात परिचय
पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर पार्थ पवार यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. तसेच या निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र, शिवसेना पक्षाच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पार्थ पवार यांचा दारूण पराभव केला होता.