IPL 2019 : ‘या’ कारणासाठी प्रत्येक सामन्यानंतर पार्थिव घरी धाव घेतो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघात चुरस लगली आहे. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आतापर्यंत एकही सामन्यात विजयी होता आले नाही. त्यामुळे संघावर जिंकण्याचा दबाव आहे. मात्र संघाचा सलामीवीर खेळाडू पार्थिव पटेल वेगळ्याच चिंतेत आणि दबावात वावरत आहे. पार्थिवचे वडील सध्या अजारी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे प्रत्येक सामना झाल्यानंतर पार्थिव रुग्णालयात धाव घेत आहे.

पार्थिवचे वडीलांवर अहमदाबादमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वडिलांवर ब्रेन हॅमरेजमुळे उपचार सुरु आहेत. मात्र पार्थिवला खेळासाठी वेगवेगळ्या राज्यात जावे लागते. त्याला वडिलांकडे लक्ष देण्यासाठी रुग्णालयात जावे लागतेय. त्यामुळे पार्थिव सध्या दोन मनःस्थितीतून जात आहे.

एका वृत्तपत्राला याबाबत पार्थिवने सांगितलं. फेब्रुवारीमध्ये पार्थिवच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे त्याचं लक्ष सारखं कुटुंबीयांच्या फोनकडे असतं. फोनच्या माध्यमातून तो सतत वडिलांच्या प्रकृतीची माहिती घेत असतो. तसंच त्याचे कुटुंबही त्याला सामन्यादरम्यान फोन करत नाहीत. मी खेळत असतो तेव्हा माझ्या मनात काहीही नसतं. पण जसा सामना संपतो, तोच माझं सर्व लक्ष घराकडे लागतं. सकाळी उठताच वडिलांच्या प्रकृतीची विचारपूस करतो, डॉक्टरांशी बोलतो. कधी-कधी त्यांच्याबाबतीत मोठे निर्णय घ्यावे लागतात. आई आणि पत्नी घरी असतात, मात्र अंतिम निर्णय हे मलाच विचारून घेतात. सुरुवातीचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे होते. कारण, व्हेंटीलेटर बंद करावं, किंवा किती ऑक्सिजन द्यावा, हे निर्णय अत्यंत महत्त्वाचे असतात, असं पार्थिवने सांगितलं.

सामन्याच्या दिवशी माझं लक्ष विचलित होऊ नये यासाठी कुटुंबातील प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. मानसिकृष्ट्या प्रचंड तणाव आहे, पण कोण काय करु शकतं ? अगोदर मनात प्रचंड वाईट विचार यायचे, पण आता कुटुंबाने स्वतःला सावरलं आहे, असं म्हणत त्याने आपलं मन मोकळे केले.

दरम्यान, वडिलांच्या प्रकृतीमुळे पार्थिवला त्यांच्याकडे लक्ष देणेही भाग आहे. त्यामुळे आरसीबीनेही पार्थिवला सामना संपल्यानंतर घरी जाण्याची परवानगी दिली आहे. सध्या पार्थिवची धावपळ जास्त होत आहे. मात्र आपल्या खेळात कोणतीही कमी येऊ नये यासाठीही तो प्रयत्न करत आहे.