नेहरू ऐवजी जीना यांना पंतप्रधान केले असते तर फाळणी झाली नसती : गुमानसिंग दामोर

रतलाम (मध्यप्रदेश) : वृत्तसंस्था – भारत स्वतंत्र झाला त्यावेळी जर नेहरूंनी हट्टीपणा केला नसता तर, या देशाचे विभाजन झाले नसते. महमंद अली जीना हे अभ्यासू होते, जर आपण त्यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतला असता तर देशाची फाळणी झाली नसती. भाजपाचे मध्य प्रदेशातील रतलाम-झाबुआ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार गुमानसिंग दामोर यांनी असे म्हटले आहे.

मतदार संघातील प्रचार रॅली दरम्यान ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, महमंद अली जीना हे एक कायदेपंडित, विद्वान होते. त्यावेळी जर त्यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतला असता तर देशाचे तुकडे झाले नसते. त्यामुळे फाळणीसाठी काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसची हीच विचारसरणी अजुनही कायम असल्याचे दामोर यांनी म्हटले.

दमोर यांच्या वक्तव्यावर प्रदेश काँग्रेसचे माध्यम प्रमुख शोभा ओझा म्हणाल्या, भाजपाकडून अशा प्रकारच्याच वक्तव्याची अपेक्षा आहे. हे काही नवीन नाही. एसपी मुखर्जी, सावरकर, आडवाणी, जसवंतसिंग आणि नरेंद्र मोदी यांनी या आगोदरच त्यांचे पाकिस्तान आणि जिन्हा बद्दलचे प्रेम दाखवून दिले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी जीना यांच्या कबरीस भेट दिली तर जसवंतसिंग यांनी त्यांच्यावर पुस्तक लिहून स्तुती केली. तर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारतामध्ये भाजपाचे सरकार पहायचे असल्याचे म्हटले होते, असेही ओझा म्हणाल्या.