भाजपाच्या ‘या’ खासदारानं राजीव गांधींचा राजीव फिरोज खान असा केला उल्लेख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीएए कायद्यावर तातडीने चर्चा करा, अशी मागणी करत विरोधकांनी संसदेत मोदी सरकारला अडचणीत आणण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल यांनी CAA, NRC, NPR या विषयांवर चर्चा करण्याची मागणी केली होती. चर्चेदरम्यान भाजपचे खासदार परवेश वर्मा यांनी लोकसभेत राजीव गांधींचा उल्लेख ‘राजीव फिरोज खान’ असा केल्याने एकच गोंधळ झाला. परवेश वर्मा यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर संसदेत चर्चा होती. जामिया मिलियामध्ये आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेला गोळीबार, शाहीनबागमधील आंदोलन त्याच बरोबर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजप खासदार परवेश वर्मा यांच्या वक्तव्यावरही चर्चेची चिन्ह आहेत.

परवेश वर्मा यांनी राजीव गांधी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर वादळी चर्चा होणार असल्याचे दिसून येत आहे. सुधारित नागरिकत्व कायदा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे मोठे यश आहे, असे राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात म्हटलं होत. यालाही विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान, हा कायदा मागे घेतला जाणार नाही, अशीच भूमिका भाजपची आहे.

परवेश वर्मा यांनी धार्मिक द्वेष पसरवणारं विधान केल्यामुळे भाजपने त्यांना स्टार प्रचारकाच्या यादीतून काढून टाकले होते. पण हेच परवेश वर्मा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभाराचा ठराव मांडणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी विरोधकांच्या बाजूने चर्चेला सुरूवात करणार असल्याची शक्यता आहे. राहुल गांधी बोलले नाही तर काँग्रेसच्या वतीने शशी थरुर आणि अधीरंजन चौधरी भाषण करतील.