संसर्ग टाळण्यासाठी 60 वर्षांवरील रुग्णांना रुग्णालयात दाखल होणे आवश्यक, मुंबई पालिकेचा निर्णय

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाची लक्षणे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल होणे आता बंधनकारक असणार आहे. संभाव्य धोके टाळण्यासाठी मुंबई पालिकेने हा निर्णय घेतला आहे. घरामध्ये स्वतंत्र खोली असल्यास सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणाची परवानगी भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने(आयसीएमआर) दिली होती. मात्र काही ज्येष्ठ रुग्ण, विशेषत: उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजारी असलेल्या रुग्णांची प्रकृती अचानक बिघडली होती.

खाट उपलब्ध करून त्यांना रुग्णालयात देखील हलविले होते. परंतु तोपर्यंत त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळेच 60 वर्षांवरील लक्षणे असलेल्या रुग्णांना घरी विलगीकरण करू नये, असे आदेश पालिकेने दिले असल्याचे विभागीय वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. अशा काही घटनांमध्ये खाट उपलब्ध न झाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी पालिकेवर केला आहे. 60 वर्षांवरील रुग्णांची प्रकृती खालावल्यानंतर उपचारासाठी धावपळ करणे योग्य नाही. वेळेत उपचार मिळावेत यासाठी नातेवाईकांच्या पसंतीनुसार रुग्णाला पालिकेच्या किंवा खासगी आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. रुग्णांना सुरुवातीचे चार दिवस सौम्य लक्षणे असली तरी साधारण पाच ते नऊ दिवसांमध्ये अचानक ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याचे दिसून आले आहे.