लालू प्रसाद यादवांनी घेतला पराभवाचा ‘धसका’ ; जेवण सोडले

पटना : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पक्षाचा झालेला पराभव पाहून राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी जेवण सोडले आहे. त्यांची झोप देखील उडाली आहे. लालू प्रसाद यादव हे सध्या चारा घोटाळ्यात झालेली शिक्षा भोगत असून प्रकृतीच्या कारणास्तव रांची येथील रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

रिम्सच्या डॉक्टरांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसापासून लालूप्रसाद नीट झोपत नाहीत तसेच दुपारचे जेवणही करत नाहीत. औषधे घेण्यासही ते टाळाटाळ करत आहेत. यांमुळे डॉक्टरांचा चिंता वाढली आहे. त्याच बरोबर लालू प्रसाद यादव यांच्या परिवारातील व्यक्तीही चिंताग्रस्त झाले आहेत.

या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलाला पुन्हा एकदा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत त्यापैकी राजदला एकही जागा मिळालेली नाही तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तब्बल ३९ जागा मिळाल्या आहेत. राजदने काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती.

निकालाच्या दिवशी लालू प्रसाद यादव सकाळी आठ वाजल्यापासून टीव्ही समोर बसून निकाल पाहत होते. ज्याक्षणी निकालाचे परिणाम एनडीएच्या बाजूने येऊ लागले त्यावेळेस लालू चिंताग्रस्त झाले. तेव्हापासून लालू प्रसाद यांचा दिनक्रम बदलल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लालूप्रसाद यादव यांचे आत्मचरित्र ‘गोपालगंज टू रायसीना’ नलिनी वर्मा लिहीत आहेत. लालूप्रसाद यांची ५० वर्षीय राजकीय कारकिर्दीचा समावेश यामधले असणार आहे.