‘सुशांत तु घाई का केलीस ?’ बिहारच्या IPS अधिकाऱ्याची काळजाला भिडणारी Post

पटना : वृत्तसंस्था – सुशांतसिंह राजपूत हा बिहारचा सुपुत्र होता. त्यांच्या आत्महत्येनंतर देशातील तरूणाई हळहळली. मात्र, बिहारच्या लोकांना त्याचं जाणं हे चटका लावून गेलं. बिहारचे आयपीएस अधिकारी विकास वैभव यांनी अतिशय भावुक पोस्ट करत सुशांतबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुशांत तु घाई का केलीस, आयुष्यातल्या प्रवासात असे चढ उतार येत असतात, थोडं थांबायला पाहिजे होतं असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.  विकास वैभव यांची अतिशय सचोटीचे अधिकारी म्हणून ख्याती आहे. टिपीकल पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रतिमेला ते अडणारे नाहीत.

पर्यावरण, प्राचिन वारसा, परंपरा, फोटोग्राफी अशा अनेक गोष्टींची त्यांना आवड आहे. सुशांत हा बिहारचा सुपूत्र असल्याने सगळ्यांनाच या उमद्या कलाकाराबाबत विशेष प्रेम होतं. आयुष्याच्या प्रवासात असे चढ उतार येत असतातच, थोडं धैर्य दाखवलं असतं तर समाधान निश्चित झालं असतं. पण हे मी तुला आधी सांगू शकलो नाही याची खंत आहे, असे अवघड क्षण क्षणिक असतात असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सुशांतची जवळची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची मुंबई पोलिसांनी जवळपास 11 तास चौकशी केली. त्यामध्ये तिने सुशांतच्या शेवटच्या दिवसांबद्दल, त्यांच्या रिलेशनबद्दल आणि नैराश्येबद्दल बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. पण त्यांच्या जॉईंट कंपन्यांबाबत काही माहिती दिली नाही. पोलीस तपासात सुशांत आणि रियाच्या एकत्रित कंपन्यांविषयीची माहिती समोर आली आहे. सुशांतच्या तीन कंपन्यांपैकी दोन कंपन्यांमध्ये रिया डायरेक्टर होती.