बॉर्डरवर नेपाळ पोलिसांकडून ‘बेछूट’ गोळीबार, 4 भारतीयांना लागली गोळी तर एकाचा मृत्यू

सीतामढी : वृत्तसंस्था – सध्या भारत आणि नेपाळ सीमेवरून दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीतच बिहारमधील भारत-नेपाळ सिमेवर नेपाळ सशस्त्र दलाकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. भारत नेपाळ सिमेवर असलेल्या बिहारमधील सीतामढी या गावात नेपाळकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये शेतात काम करणाऱ्या एका भारतीयाचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या घटनेनंतर सिमेवर तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.

दोघांची प्रकृती नाजूक
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नारायणपूर आणि लालबन्दी सीमाभागात घडली. पिपरा परसाईन पंचायतीच्या जानकी नगर सिमेवर काही जण शेतात काम करत होते. त्याचवेळी नेपाळच्या दिशेकडून अंदाधुंद गोळीबार सुरु झाला. या दरम्यान एका भारतीयाचा मृत्यू झाला आणि दोन जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहे. या दोघांना सीतामढीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि काही वरिष्ठ अधिकारीही रवाना झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

नेपाळसोबत चर्चा का नाही ?
नेपाळचा नवीन नकाशा कायम राहणार असून त्यात काहीही बदल होणार नाही, असे नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावाली यांनी म्हटलं आहे. नेपाळने नवीन नकाशा जारी केला असून त्यात लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा हे भारतीय प्रदेश नेपाळमध्ये दाखवले आहेत. नकाशामधील या बदलांना नेपाळच्या संसदेची मान्यता आवश्यकता आहे. त्यासाठी नेपाळच्या संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. नेपाळने लिपूलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा या भारतीय प्रदेशांवर दावा केला आहे. नेपाळच्या नकाशामध्ये बदल करण्याला सर्वपक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा बदल कायम राहणार आहे. असे नपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावाली यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वृतपत्राशी प्रदीप ग्यावाली बोलत होते.