संजय गांधी निराधार योजनेचे पैसे त्वरित द्या, भाजयुमोची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाव्दारे मागणी

चंद्रपुर – महाराष्ट्रात कोरोना चे संकट संपता संपत नाही आहे. अशातच,जनतेसमोर जावे तरी कुठे..? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संकटात संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान अद्यापही लाभार्थ्यांना मिळाले नसल्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक संकट आणखी गंभीर झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निराधारांना तातडीची मदत करण्याची आवश्यकता असताना त्यांच्या हक्काचे अनुदान ३ महिन्यापासून देय आहेत.या लोकांवर आता उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या हजारो लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे.

अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून भारतीय जनता युवा मोर्चाने राज्य शासनाकडे मंगळवार (६ऑक्टोबर) ला केली आहे. समाज कल्याण,माजि सभापती,भाजयुमो नेते ब्रिजभूषण पाझारे व जिल्हाध्यक्ष (श) विशाल निंबाळकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात,सुरज पेदुलवार,प्रज्वलंत कडू,सुनिल डोंगरे, यश बांगडे आणि कुणाल गुंडावार यांची उपस्थिती होती.

चर्चे दरम्यान पाझारे म्हणाले आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार वित्तमंत्री असतांना निराधारांना असा त्रास कधी झाला नाही. वेळेतच लाभार्थ्यांना अनुदान दिले जात होते. परंतु महाविकास आघाडी सरकारने कोरोना समोर करून तोंडाला पाने पुसली आहे. १९८० ला सुरू झालेल्या या योजनेत निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग,शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, घटस्फोटीत महिला, अनाथ मुले, तृतीयपंथी व परितक्त्या यांना अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली.एका व्यक्तीला दरमहा ६०० रु व कुटुंबात २ लाभार्थी असतील तर ९००रु अनुदान देण्याची ही योजना आहे.

कोरोनाच्या संकटात भरीव मदत करणे सोडून शासन या लोकांवर अन्याय करीत आहे,असा आरोपही त्यांनी केला. या विषयाला गांभीर्याने न घेतल्यास भाजयुमो यासाठी आंदोलन उभारले असा मौखिक इशारा पाझारे यांनी दिल्याने सर्वांचे लक्ष भाजयुमो कडे लागले आहे.