Lockdown : ‘कोरोना’च्या वर्तमान संकटानं वाढवली भविष्याची ‘चिंता’, ज्योतिषांकडे प्रश्नांची ‘झडी’

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या सद्य परिस्थितीमुळे लोकांना भविष्याबद्दल चिंता वाटायला लागली आहे. आर्थिक संकट, आरोग्याच्या धोक्यामुळे लोकांची झोप उडाली आहे. अशा परिस्थितीत, लोक कोरोना संकटाच्या वैज्ञानिक निदानाबद्दल होणाऱ्या सर्व घडामोडींच्या वृत्तावर सतत लक्ष ठेवून असतात. परंतु यादरम्यान, ज्योतिषाचे मूल्यांकन जाणून घेण्यासाठी ज्योतिष आणि पंडितांकडे फोन कॉल्स वाढले आहेत. विशेष म्हणजे या संकटाचा वैयक्तिक जीवनावर होणारा परिणाम जाणून घेण्याशिवाय, देश आणि जगातून या विषाणूचा धोका कधी दूर होईल हे देखील लोकांना जाणून घेण्याची इच्छा आहे. अर्थव्यवस्था कधी रुळावर येईल? हा विषाणू पुन्हा तर येणार नाहीना, असे अनेक प्रश्न लोकांना पडत आहेत.

हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, जवळजवळ 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये कार्यरत असणारी प्रसिद्ध अ‍ॅस्ट्रोवेबसाइट गणेशा स्पीक्स डॉट कॉम (GaneshaSpeaks.com) चे पदाधिकारी धर्मेश जी. जोशी म्हणतात, ‘पहिले लोक संबंध, प्रेम विवाह, मुले, करिअर, नोकरी आणि आरोग्याच्या संदर्भात प्रश्न विचारत असत. परंतु या संकटानंतर हा क्रम उलट झाला आहे. नोकरी-करिअर, आरोग्यासाठी लोक प्रश्न विचारत आहेत.’ धर्मेश म्हणतात की सर्वात मोठी गोष्ट म्हणजे परदेशात राहणारे लोक आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या आरोग्याबद्दल जास्तीत जास्त प्रश्न विचारत आहेत. त्यांचे पालक सुरक्षित असतील की नाही हे त्यांना जाणून घ्यायचे आहे, आणि ते या संसर्गाच्या तावडीतून बचावतील का? असे प्रश्न लोकांकडून केले जात आहेत.

हिंदी आणि भारतातील बर्‍याच भाषांमध्ये चालणारी लोकप्रिय वेबसाइट अ‍ॅस्ट्रोसेज डॉट कॉम (astrosage.com) चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत पांडे यांनीही कोरोना संकटामुळे प्रश्नांच्या संख्येत होणारी वाढ मान्य केली. ते म्हणतात, ‘प्रश्नांच्या संख्येत किती टक्के वाढ झाली हे नक्की सांगता येत नाही. पण जवळजवळ 30-35 टक्के प्रश्नांमध्ये वाढ तर झालीच आहे.’ असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ते म्हणतात की ‘लोक आर्थिक संकटामुळे घाबरले आहेत, भविष्याच्या बाबतीत त्यांना भीती सतावत आहे. तसेच त्यांना जाणून घ्यायचे आहे की त्यांची यापुढील आर्थिक स्थिती कशी राहील? एकूणच काय तर त्यांना नोकरी जाण्याची भीती आणि पगारात कपात होण्याची चिंता सतावत आहे.

कोरोना संकटामुळे उद्भवले प्रश्न, ज्योतिषविज्ञानात लोक शोधत आहेत समाधान

– धर्मेश जी. जोशी म्हणतात, सुरुवातीच्या 15-20 दिवसात लोक विचारत होते की इंक्रीमेंट तर थांबणार नाहीना? पदोन्नतीमध्ये काही अडथळा तर येणार नाही ना? कारण एप्रिल-मे मध्ये लोकांना वाढ आणि पदोन्नतीची अपेक्षा आहे. पण लॉकडाऊन जसजसे वाढत गेले तसतसे लोकांनी विचारण्यास सुरुवात केली की इंक्रीमेंट, पदोन्नती तर सध्या सोडा, कृपया हे सांगा की नोकरी टिकून राहील की नाही! वेतन कपात तर होणार नाहीना?

– भारताबाहेर राहणारे लोक आपल्या वृद्ध पालकांची सतत चौकशी करत असतात. त्यांना संसर्ग होण्याचा कोणता धोका तर नाही. ज्यांचे पालक बळी पडले आहेत ते विचारत आहेत की त्यांचे पालक या संकटाचा सामना करू शकतील काय?

– लोक व्यवसायाशी संबंधित प्रश्न देखील विचारत आहेत. उद्योजक विचारत आहेत की याक्षणी तर हानी होत आहे. पण भविष्यात ते यावर मात करतील का? लॉकडाऊन उघडल्यानंतर ही नुकसान भरपाई होईल का? कंपनी सुरू राहील का?

– विशेष गोष्ट म्हणजे लोक व्हिडिओद्वारे देश आणि जगाच्या दृष्टीकोनातून प्रश्न विचारत आहेत. जसे की लस कधी सापडेल. भारत या संकटातून मुक्त कधी होईल? हे संकट जगभर किती काळापर्यंत राहील? वगैरे वगैरे…