ममता बॅनर्जींच्या समर्थकांनी ‘त्या’ कारणासाठी मोदींना धाडली १० हजार पत्रे !

कोलकत्ता : वृत्तसंस्था – तृणमुल काँग्रेस कार्यकर्त्यांनी व पश्‍चिम बंगालमधील डमडम येथील स्थानिक नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘वंदे मातरम, जय हिंद व जय बांग्ला’ असे लिहिलेले दहा हजार टपाल पत्र पाठवले आहेत. मात्र त्याला कारणही राजकीय आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गाडीपुढे जात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘ जय श्रीराम’च्या दिलेल्या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून ही पत्रे पाठविण्यात आली आहेत.

तृणमुल काँग्रेस व भाजपा यांच्यात सुरू असलेले राजकीय युद्ध लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर अधिकच वाढताना दिसत आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी ‘जय श्री राम’ घोषणा दिल्याने मागील काही दिवसांपूर्वी भडकलेल्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीटर व फेसबुकवरील आपला डीपी बदलला आहे. त्यांच्या डीपीवर आता ‘जय हिंद, जय बांग्ला’ लिहिलेले दिसत आहे. ममता यांच्याबरोबरच त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी देखील आपला डीपी बदलला आहे. आता यानंतर मंगळवारी टीएमसी कार्यकर्त्यांनी व डमडम येथील स्थानिक नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दहा हजार टपाल पत्र पाठवली आहेत. ‘ज्यात वंदे मातरम, जय हिंद व जय बांग्ला’, असे लिहिलेले आहे.

काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी भाटपारा येथून जात असताना काही जणांनी ‘जय श्रीराम’ असे नारे दिल्यानंतर ममता कमालीच्या चिडल्या होत्या. एवढेच नाहीतर यामुळे भडकलेल्या ममतांनी गाडी बाहेर येत आपल्या सुरक्षा रक्षकांना या लोकांची नावे लिहून घेण्यासही सांगितले होते. तसेच, त्यांनी यावेळी या लोकांना उद्देशून हे देखील म्हटल्याचे बोलले जात आहे की, तुम्हाला काय वाटते? तुम्ही परराज्यातून याल, इथे राहाल व आमच्याबरोबर चुकीची वर्तवणूक कराल. मी हे सहन करणार नाही. तुमची हिम्मतच कशी झाली मला अपमानित करण्याची? तुमच्या सगळ्यांची नावे व पत्ते लिहून घेतली जातील. असे म्हणून ममता गाडीत बसताच त्या लोकांनी पुन्हा ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या, त्यामुळे त्या पुन्हा एकदा गाडी बाहेर आल्या होत्या. तत्पूर्वी भाजपाकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली दहा लाख पत्र पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.