पाहा : मंत्री यशोमती ठाकूर यांचं ‘वादग्रस्त’ विधान, म्हणाल्या – ‘अजून खिसे गरम व्हायचेत’ (व्हिडीओ)

वाशीम : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमुळे राज्यातल्या ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापायला लागले आहे. राजकीय नेते ग्रामीण भागात सध्या झंझावाती प्रचार करत आहेत. राज्याच्या महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा परिषद प्रचारासाठी आज वाशीममध्ये सभा घेतली त्यावेळी त्यांनी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. आपले काय सरकार नव्हते, आता फक्त शपथच घेतली आहे, खिसे गरम व्हायचेत, मात्र जुन्या सत्ताधाऱ्याचे खिसे गरम आहेत. ते तुमच्याकडे आले तर पैसे घ्या, असे विधान त्यांनी केले आहे.

यशोमती ठाकूर यांनी वाशीममध्ये केलेले वक्तव्य म्हणजे सरळसरळ भ्रष्टाचाराला उत्तेजन देणारे असल्याची टीका होत आहे. मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याला भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. ठाकूर यांचे वक्त हे भ्रष्टाचाराला उत्तेजन देणारं आहे, अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या यशोमती ठाकूर यांनी या आधीही अनेकवेळा आपल्या वक्तव्यामुळे वाद ओढावून घेतले होते.

बच्चू कडूंचा सरकारला घरचा ‘आहेर’
शेती आणि कर्जाच्या समस्येबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी आणि त्याच्या आठ वर्षाच्या मुलीला पोलिसांनी मातोश्री बाहेर ताब्यात घेतले. यावर नवनिर्वाचीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. शेतकऱ्यांची अडवणूक करणे चुकीचे आहे. सामान्य नागरिक असो की शेतकरी मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली पाहिजे असे म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. प्रशासनाकडून झालेली चूक दुरुस्त करणे गरजेचे आहे. असा काळ आला तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/