पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune ) टेकड्यांवर सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. फिरायला येताना नागरिक आपले पाळीव श्वान घेऊन येत असतात. मात्र, काही पाळीव श्वानांच्या गळ्यात पट्टे नसल्याने हे श्वान फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या अंगावर धाऊन जाण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच या श्वानांमुळे वन्य प्राण्यांच्या मुक्त संचारावर मर्यादा येऊ लागली आहे. त्यामुळे राखीव वनक्षेत्रांमध्ये पाळीव प्राण्यांना फिरवण्यावर वन विभागाने बंदी घातली आहे. हा आदेश पुणे (Pune ) शहरातील सर्व टेकड्याबाबत लागू आहे.
टेकड्यांवर फिरायला येताना नागरिक आपले पाळीव प्राणी घेऊन येतात. काही कुत्र्यांच्या गळ्यात पट्टे नसल्याने ते पायवाट सोडून इतरत्र फिरतात. काही वेळा बांधलेले श्वान झुटपांमध्ये कोठे मोर दिसला तर त्यांच्या दिशेने जोरजोरात भुंकतात. त्यामुळे परिरसाची शांतता भंग होते. शिवाय यामुळे इतर वन्य प्राणी घाबरतात. तर काही वेळा दोन मोकळी कुत्री टेकड्यावर भांडत असल्याचे निदर्शनास आले आहे.
श्वानांच्या नैसर्गिक विधीसाठी टेकडीवर फिरायला घेऊन येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे टेकडीवरील गवतामध्ये अनेकदा घाण पडलेली असते. टेकडीवर श्वानांना फिरायला घेऊन येणाऱ्यांचे ग्रुप तयार झाले आहेत. यामुळे वैतागलेल्या नागरिकांना मागील काही वर्षापासून वन विभागाकडे तक्रारी करत पाठपुरावा केला आहे. वर्षभरापूर्वी तळजाई टेकडीवर वन विभागाने पाळीव प्राण्यांना टेकडीवर फिरण्यास आणू नये असा फलक लावला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करत नागरिक सर्रासपणे आपले पाळीव प्राणी टेकडीवर फिरण्यासाठी घेऊन जातात.
त्यामुळे वन विभागाने आता शहरातील वेताळ टेकडी, हनुमान टेकडी, लॉ कॉलेज, बावधन, पाचगाव पर्वतीसह सर्वच टेकड्यांवर पाळीव प्राण्यांना प्रवेश बंद केला आहे. तसेच टेकड्यांच्या प्रवेशद्वाराव तसे फलक लावण्यात येत आहेत. राज्य वन नियम 2014 तील नियमानुसार राखीव वनक्षेत्रामध्ये पाळीव प्राणी आणि कुत्र्यांना बंदी आहे. या प्राण्यांमुळे वन्यप्राण्यांच्या फिरण्यावर मर्यादा येऊन त्यांना असुरक्षित वाटते. तसेच श्वानांकडून वन्य प्राण्यांवर हल्ले होण्याची शक्यता आहे. पुण्यातील टेकड्यांवर वन्यप्राण्यांचा वावर असून पाळीव श्वानांमुळे त्यांच्यामध्ये रोगराई पसरण्याची भीती आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन वन विभागाने हा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.