‘त्या’ घोटाळ्या प्रकरणी शरद पवारांवर अण्णांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीचे काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यात असलेल्या अनेक सहकारी साखर कारखान्यांसंदर्भातिल सर्व घोटाळ्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांचा हात आहे असा आरोप करत दाखल केलेल्या तक्रारीवर काय कारवाई केली ? असा सवाल शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील एमआरए मार्ग पोलिसांना केला आहे.

२०१६ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील बेकायदेशीर पद्धतीने विक्री करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. तसेच अनेक कारखान्यांचे बेकायदेशीर पद्धतीने खासगीकरणही करण्यात आले. या सर्व घोटाळ्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांचा हात आहे. इतकेच नव्हे तर, या घोटाळ्यामुळे सहकार चळवळीला गालबोट लावत राज्य सरकारचा सुमारे २५ हजार कोटींचा महसूल बुडवला आहे, असा आरोप करत हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती. दरम्यान, यासंदर्भात आधी पोलिसांत तक्रार द्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्याने अण्णांनी क्रॉफर्ड मार्केट जवळील एमआरए मार्ग पोलिसांत रीतसर तक्रार नोंदवली होती. परंतु, ‘आता दोन वर्षे उलटली तरी पोलिसांनी त्या तक्रारीवर काहीच केले नाही’, असे शुक्रवारी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

विशेष म्हणजे, ही ‘तक्रार प्रभावशाली व्यक्तींविरुद्ध असल्याने पोलीस कारवाई करत नसून चौकशी न होण्यामागची काय कारणं आहेत?’ अशी विचारणा अण्णांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून केल्याकडे वकीलांनी हायकोर्टाचे लक्ष वेधले. तेव्हा या प्रश्नाची दखल घेत मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने सरकारी वकीलांना चौकशीच्या प्रगतीबद्दल विचारणा केली. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर देता न आल्याने हायकोर्टाने संबंधित तपास अधिकाऱ्याला चौकशीच्या प्रगती अहवालासह ८ मार्चला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, यासंदर्भातील आतापर्यंतच्या चौकशीच्या प्रगती अहवालासह तपास अधिकाऱ्याला ८ मार्चला होणाऱ्या पुढील सुनावणीस हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देशही दिलेले आहेत.