अनुसूचित जातीच्या आरक्षणात ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ या 4 प्रवर्ग निर्मितीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महिन्याभरात निर्णय अपेक्षित

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – अनुसूचित जातीच्या आरक्षणात अ,ब, क, ड असे चार प्रवर्ग निर्माण करण्याबाबत महिन्याभरात सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय होणे अपेक्षित आहे. या धोरणामुळे अनुसूचित जातीतील लाखो कुटुंबांना लाभ मिळणार आहे, असा विश्वास माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केला. ते पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अजित केसराळीकर, अजय साळुंखे, वसुंधरा वुमन्स फाउंडेशनच्या संस्थापिका कोमलताई साळुंखे, अमित गोरखे, अनिल सौंदडे, महेश खिलारे आदी या वेळी उपस्थित होते. या प्रकरणी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, अनुसूचित जाती प्रवर्गातील उपेक्षित, दिनदुबळे, वंचिताना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जातीमध्ये 59 जातीचा समावेश आहे. साधारण 1 कोटी 32 लाख लोकसंख्येला 13 टक्के आरक्षण उपलब्ध आहे. एका बाजुला निम्म्या संख्येत बौद्ध समाज आहे. तर निम्म्या लोकसंख्येत उर्वरित राहिलेल्या लोकसंख्येत 8 जातीचा समावेश आहे. त्या सर्व उपेक्षित समाजाला वर आणण्यासाठी आणि विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी घटनाकारांनी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद केली आहे. अनेक अनुसूचित जातीमधील समाजघटकांनी जातनिहाय आरक्षण मिळावे, यासाठी मागणी केली होती.

आरक्षण हे जातीवर नसून समूहावर असते, हे विचारात घेता स्वर्गीय गोपीनाथ मुंढे साहेबांनी भटक्या विमुक्तांमध्ये प्रवर्ग निर्माण केला. तसेच ओबीसीचे विमुक्तांच्या धर्तीवर अनुसूचित जाती निर्माण करावा. लोकसंख्या प्रमाणात मागासवर्गीयात देखील अ,ब, क, ड प्रमाणे चार प्रवर्ग करण्यात यावेत, अशी मागणी देशभरातील विविध राज्यातून सुरू आहे. महाराष्ट्रात गेली 20 वर्षापासून हा लढा सुरू आहे. त्याला यश म्हणून भारतातील 12 राज्यांनी असे केंद्राला कळविले आहे. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राला शिफारस करण्याचे आश्वासन नागपूर आधिवेशात दिले आहे.

गेली 2 वर्ष प्रयत्न केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अ, ब,क, ड प्रवर्ग लागू करण्यासाठी याचिका दाखल करावी, असे प्रयत्न सुरु होते. त्याला यश आले असून, सर्वोच्च न्यायालयामध्ये 4 नोव्हेंबरला म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यावर महिन्याभरात सुनावणी होण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले मान्यवर येणाऱ्या पंधरा तारखेला सुनावणीवेळी स्वत: जातीने उपस्थित राहणार आहोत.

दोन वर्षाच्या पाठपुराव्याला यश आले आहे. पहिल्यांदाच न्यायाललाने याविषयी सकारात्मक भूमिका घेतली आहे. यापुढे उषा मेहरा आयोग, बी. एन. लोकूर समिती, हुकुमसिंह समिती, एस. जे. सदाशिव आयोग, पी.रामचंद्र राजू आयोग असे पाच आयोग व त्याचे अहवाल सादर केले आहे. आणखी सहा राज्याचे अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. या लढ्यासाठी समाजाचे पाठबळ आवश्यक आहे, असे मत ढोबळे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईची मागणी वाढली आहे. सर्व पक्षीय लोक तत्काळ राज्यभरात फिरून शेतकर्‍यांचे झालेले नुकसान पाहून हळवे होत आहेत. मात्र, दुसरीकडे राज्यभरात वीट बिगार कामगारांची संख्या वाढली आहे. दलित वस्त्यांवर हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. या अनुसूचित जातीच्या आरक्षणात अ,ब, क,ड असे चार प्रवर्गातील लोकांसाठी ही सर्व पक्षांच्या मंडळींनी तत्काळ धावून गेले पाहिजे. हळहळ व्यक्त केली पाहिजे, अशी अपेक्षा लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केली.

Visit : Policenama.com