10 रूपयांची ‘थाळी’ अन् 15 रूपयांची पाणी ‘बॉटल’, शिवभोजनावर ‘ताव’ मारल्यानंतर जितेंद्र आव्हाड ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघडीचे सरकार आल्यानंतर शिवसेनेने आपल्या शिवभोजन थाळीचा आज राज्यात प्रारंभ केला. राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते या शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. मात्र, त्यांनी या थाळीचा आस्वाद घेण्यास नकार दिला. तर छगन भुजबळ यांनी स्वत: भोजनाची थाळी तयार करून ती लाभार्थ्यांना दिली.

राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये शिवभोजन केंद्रांना सुरुवात करण्यात आली. शिवभोजन थाळीमुळे गरजू आणि गरीब लोकांची भूक भागणार असून बचत गटांना यामधून रोजगार उपलब्ध होणार आहे. कमी दरात पोटभर जेवण देणारी सरकारची योजना राज्यात सुरु झाली असून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील मनिषा नगर येथील शिवभोजन केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी 10 रुपयात मिळणाऱ्या या थाळीचा आस्वादही घेतला.

परंतु आव्हाड यांच्यासोबत 10 रुपयांच्या थाळीसोबत 15 रुपयांची पाण्याची बाटली असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत. आहे. 10 रुपयांच्या थाळीसोबत पाण्याची बाटलीही मिळणार का ? असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. विशेष म्हणजे 10 रुपयांच्या थाळीसोबत 15 रुपयांची पाणी बॉटल असल्याने गरिबांनाही थाळीसोबत पाणी बॉटल मिळणार का, असे म्हणत आव्हाड यांचा फोटो व्हायरल करण्यात येत आहे. आव्हाड यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरही नेटकरी टीकात्मक प्रश्न विचारत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –