कायद्याची भाषा सर्वसामान्यांना समजेल अशी हवी : PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कायद्याची भाषा किचकट आहे. ज्यांच्यासाठी कायदा तयार केला त्याला घटनात्मक आणि कायदेशीर भाषा समजणे फार कठीण आहे. कठीण शब्द, मोठे वाक्य, परिच्छेद आदी समजणे अवघड आहे. त्यात सर्वसामान्यांना समजेल असे बदल आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी स्पष्ट केले. तसेच आजच्या दिवशी बारा वर्षापूर्वी झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचे घाव आपण विसरू शकणार नाही, असे ते म्हणाले.

संविधान दिनानिमित्त राज्याच्या विधीमंडळाच्या पीठासीन अधिका-याच्या परिषदेचा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे समारोप प्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या परिसरात ही परिषद भरली होती. यावेळी मोदी म्हणाले, प्रत्येक नागरिकांचा आत्मविश्वास वाढावा ही राज्य घटनेची अपेक्षा आहे. कर्तव्याला प्राधान्य दिले तर हे शक्य आहे. यापूर्वीच्या काळात नेमके याकडेच दुर्लक्ष झाले. घटनेत प्रत्येक नागरिकांच्या कर्तव्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. घटनेबाबत सामान्य नागरिकांना समजायला हवे यासाठी प्रयत्न करायला हवे, असे ते म्हणाले.