प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले असून दिलासा दिला आहे. वेळेत कर भरणार्‍या प्रामाणिक करदात्यांसाठी एक नवे व्यासपीठ तयार केले असून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले.‘पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान’ असे या व्यासपीठाचे नाव आहे.

देशातील प्रामाणिक करदाता देशाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका निभावत आहे. त्यामुळेच देशाचाही विकास होत असतो. आज प्रत्येकाला शॉर्टकट योग्य नसल्याचे लक्षात येत आहे. चुकीचे मार्ग निवडणे योग्य नाही. ती वेळ, काळ निघून गेला आहे. देशभरात नवे बदल होत आहेत. या नव्या व्यासपीठामुळे नियमित कर भरणार्‍यांच्या मनातील भीती दूर होईल, असे नरेंद्र मोदींनी सांगितले आहे. एक काळ होता जेव्हा बदल करण्यासंबंधी खूप चर्चा व्हायची. काही वेळा दबावात किंवा इच्छा नसतानाही निर्णय घेत बदल करण्यात आल्याचं सांगितलं जायचं. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आम्ही धोरणात्मक बदलाला महत्त्व दिले आहे. प्रत्येकाचा दुसर्‍याशी संबंधही असला पाहिजे याकडे लक्ष देत आहोत, असेही मोदींनी सांगितले.

गेल्या काही वर्षात अनेक कायदे रद्द करण्यात आले. सहज व्यवसाय करण्यामध्ये भारत आता 63 व्या क्रमांकावर आला आहे. यामागे कऱण्यात आलेले अनेक बदल कारणीभूत आहेत. यामुळे परदेशी गुंतवणूकदरांचा विश्वास वाढत आहे.ज्या शहरात आपण राहतो तेथील कर विभाग आपल्या सर्व गोष्टी हाताळतो असं होतं. या नव्या व्यासपीठामुळे कर अधिकार्‍याची भूमिका बदलली आहे.