पंतप्रधानांकडून सुडाचे राजकारण, शरद पवारांचा आरोप

पोलिसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचे राजकारण करत आहेत. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर हा सरळसरळ होतो आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. संजय राऊत यांनी पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राऊत यांनी प्रश्न विचारला ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही त्या राज्यांचे प्रमुख नेते असतील ते कायम असा आरोप करतात की नरेंद्र मोदी सूडाचे राजकारण करतात. मध्यप्रदेश हे त्याचे ताजे उदाहरण आहे.

यावर पवारांनी उत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी सूडाचं राजकारण करत आहेत. सत्तेचा गैरवापर करत आहेत हे दिसत आहे. ज्यावेळी मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते तेव्हा मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. काही राज्यांची सत्ता भाजपाकडे होती. मात्र त्यावेळी पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग यांनी कधीही सूडबुद्धीचे धोरण भाजपाशासित राज्यांच्या बाबतीत स्वीकारले नाही. त्या काळात ज्यावेळी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसोबत बैठक असे त्यावेळी भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक दोन दिवस आधी होत असे. त्या बैठकीत देशाच्या पंतप्रधानांबाबत अत्यंत कठोर शब्दात नरेंद्र मोदी टीका करत असत. याआधी एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री इतक्या कठोर शब्दांत पंतप्रधानांवर टीका करतो हे आम्ही पाहिले नव्हते.

मनमोहन सरकारमध्ये मी कृषीमंत्री होतो. त्यावेळी गुजरातलाही काही वेळा जाणं झालं. ज्यानंतर काँग्रेसमधल्या काही मंत्र्यांनी माझ्यावर टीका केली, ते म्हणू लागले की मोदी इतकी टीका मनमोहन सिंग यांच्यावर करत आहेत तर भारताचे कृषीमंत्री गुजरातचा दौरा का करतात? त्यावेळी पंतप्रधान असलेल्या मनमोहन सिंग यांनी सांगितलं की गुजरातही आपल्या देशाचा भाग आहे.आपण सगळ्या देशाची हिताची जपणूक करण्यासाठी बसलो आहे. त्यामुळे शरद पवार जे करत आहेत ते योग्य आहे. हे धोरण कुठे आणि आजचे धोरण कुठे? आज याच्या उलट परिस्थिती आहे. ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही तिथे फोडाफोडी करा. याचे सरकार पाड, त्याचे सरकार पाड. राजस्थानमध्येही काहीतरी प्रयोग सुरु केले आहेत. त्यामुळे मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या धोरणात कमालीचा फरक जाणवतो.