मंत्री बच्चू कडूंचा केंद्र सरकारवर प्रहार, म्हणाले – ‘PM मोदींचं नियोजन चुकलच’

अहमदनगरः पोलीसनामा ऑनलाइन – देशावर कोरोनाचे संकट वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला ओरडून सांगत होते की, भारतातून कोरोना हद्दपार झाला आहे. पण झाले काय, आज जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण भारतात आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी कोरोना रोखण्यासाठी नियोजन करण्यात चुकल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत आहे. तरी सुद्धा राज्य सरकारने चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे. देशात सर्वात चांगले व्यवस्थापन महाराष्ट्रात आहे. जगभरात महाविकास आघाडी सरकारचे कौतुक होत आहे. इतर राज्यांपेक्षा आपली व्यवस्थाही चांगली असल्याचे कडू म्हणाले.

अहमदनगरमध्ये प्रहार जनशक्तीतर्फे सुरु केलेल्या कोविड सेंटरची पाहणी मंत्री बच्चू कडू यांनी केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, देशात ऑक्सिजन, इंजेक्शनचा तुटवडा आहे. म्हणजे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी जे नियोजन करायला हवे होते ते केले नाही. पंतप्रधान मोदीनी मोदींनी योग्य नियोजन केले असते तर आजही परिस्थिती निर्माण झाली नसती, असे कडू म्हणाले. केंद्रात भाजपची सत्ता आहे. राज्यातील भाजपचे नेते केंद्र सरकारकडे जाऊन काही निवेदन दिले आहे का किंवा केंद्राकडून काही मदत आणली आहे, असे कुठेही दिसले नाही. त्यांनी जर काही मदत आणून दिली असती तर तेवढाच हातभार लागला असता. पण, भाजपच्या नेत्यांना राज्य सरकारवर टीका करण्याशिवाय दुसरे काही केलेच नाही, असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. महाराष्ट्राला केंद्राकडून गरजेपेक्षा कमी ऑक्सिजन मिळत आहे. मात्र, राज्याने याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी पावले उचलली असून ऑक्सिजन प्लांट सुरू झाले असून काही लवकरच सुरू होतील. कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरला आहे. मेळघाटमध्ये आदिवासी पट्यात सुद्धा कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याचे कडू म्हणाले.