PMO च्या एकाधिकारशाहीमुळं होतेय अर्थव्यवस्था ‘बेजार’,रिझर्व्ह बँकेच्या माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अर्थव्यवस्थेवर सध्या मोठ्या प्रमाणात मंदीचे सावट आहे. त्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त करत भाजपा सरकारला कारणीभूत ठरवत सडकून टीका केल्या आहेत. आता रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी देखील यावर भाष्य केले असून सर्वच अधिकार पंतप्रधान कार्यालयात (PMO) एकवटल्याने इतर मंत्र्यांकडे अधिकार नाहीत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मंदीने बेजार झाली असून नजिकच्या काळात ती आणखी खोलात जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी रघुराम राजन यांनी काही सूचना केल्या आहेत. त्या म्हणजे भांडवली बाजार आणि गुंतवणूक, जमीन, कामगार कायदा या कायद्यांमध्ये सुधारणा करून परिस्थिती आटोक्यात आणता येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सध्या देशाचा जीडीपी दर घसरला आहे आणि महसूल तूट देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबत आकडेवारी बघितली तर लक्षात येईल की सरकारी तिजोरीवर याचा कसा परिणाम होतो.

रघुराम राजन म्हणतात की भारताने मुक्त व्यापार करारात उत्स्फूर्तपणे सहभागी घेतला पाहिजे. यामुळं देशात स्पर्धा निकोप होईल आणि देशांतर्गत कार्यक्षमता वाढेल, असं राजन यांनी म्हटलं आहे. राजन पुढे म्हटले की अर्थव्यवस्थेचं गणित खऱ्या अर्थाने पंतप्रधान कार्यालयात झालेले अधिकारांचे केंद्रीकरण यात बिघडले आहे. कारण येथील सर्व निर्णय पंतप्रधान आणि आजूबाजूच्या मोजक्या लोकांकडून घेण्यात येतात. खऱ्या अर्थाने तेथे राष्ट्रीय पातळीवर व्यापक विचार करणारी तज्ज्ञ मंडळी असायला हवी. परंतु त्या लोकांचा अभाव असल्याने राजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच राजन यांनी आघाडी सरकारने विकासाभिमुख कार्यक्रम राबवला होता असे स्पष्ट केले. अधिकारांचे केंद्रीकरण, अनुभवी मंत्र्यांची अनुपस्थिती आणि दूरदृष्टीचा अभाव या गोष्टींमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे असे देखील त्यांनी सांगितले. ही मंदी तात्पुरती प्रकारची नसून केंद्र सरकारने त्यास हलक्यात घेऊ नये असे देखील सूचक विधान त्यांनी केलं. राजन यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. कारण ग्रामीण बाजारपेठ सुस्तावल्याने अर्थव्यवस्था मंदीच्या कचाट्यात सापडली आणि त्यामुळेच बांधकाम, स्थावर मालमत्ता आणि कारखाना उत्पादन आदी क्षेत्र प्रचंड अडचणीत आहेत. यांना पत पुरवठा करणाऱ्या बिगर बँकिंग वित्त संस्था देखील संकटात आल्या आहेत. परिणामी बड्या बँकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या सगळ्यांचा परिणाम युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे कारण वित्तीय सेवा क्षेत्र प्रचंड अडचणीत असल्याने बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून युवकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. रोजगार मिळणे अवघड झाले आहे कारण उद्योजकांनी गुंतवणूक करण्यास हात आखडता घेतला आहे. आहे तेच उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने नवीन उद्योगधंदे निर्माण होत नसून बेरोजगारीत वाढ होत आहे. कंपन्यांमध्ये जे कर्मचारी आहेत त्यांनाच उतरती कळा लागली आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेत बिघाड झाल्याचे स्पष्ट दिसत आहे असे राजन म्हणाले.

Visit : Policenama.com