रानभाज्या खाऊन एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा

खोपोली : पोलीसनामा ऑनलाइन – खोपोलीतील आडोशी गावात आदिवासी पाड्यातील एकाच कुटुंबातील ५ जणांना रानभाजी खाल्याने विषबाधा झाली. त्यांच्यावर खोपोलीतील रुग्णालयात तातडीने उपचार केल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

पावसाळ्यात अनेक रानभाज्या उगवतात. आदिवासी पाड्यांमध्ये त्यांची भाजी करुन खाण्याची पद्धत आहे. मात्र, त्यातील काही भाज्या या विषारी असतात. जुन्या जाणत्या लोकांना त्याची चांगली माहिती असते.
आडोशीजवळील जंगमवाडीतील रघुनाथ वाघमारे यांनी जंगलातून अळंबी तोडून आणली व घरी कुटुंबासह त्याची भाजी करून खाल्ली. मात्र, थोड्या वेळाने घरातील सर्वांना मळमळ, उलटीचा त्रास होऊ लागला. याबाबत गावातील प्रफुल्ल देशमुख यांनी खोपोली नगरपालिका रुग्णालयात माहिती देताच रुग्णालयाचे पथक रात्रीच गावात दाखल केले.

बाधित रुग्णामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. तीन पुरुष व दोन स्त्रियांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू करण्यात आल्याने प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर ज्या रानभाज्या आपल्याला परिचित आहेत, त्याच खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.