श्रीरामपूरात भांडण झाल्यानं मामाकडून विष प्राशन, भाच्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

पोलिसनामा ऑनलाईन – किरकोळ कारणावरुन मामा-भाच्यात वाद झाले. त्याचे रूपांतर भांडणात झाल्याने मामा विष प्यायला तर घाबरलेल्या भाच्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेत भाचा ठार झाला असून मामावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथे ही घटना घडली आहे.

टाकळीभान येथील नवनाथ वेणूनाथ खंडागळे (वय 30) यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्यांचा भाचा मनोज चव्हाण (वय 22) असे ठार झालेल्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडागळे यांनी काही जमीन त्यांच्या बहिणीला दिली आहे. त्यामुळे मामा-भाचे दोघेही मिळून शेती करीत. काल मामा-भाच्यात किरकोळ वाद झाला. त्यातून मामा नवनाथ खंडागळे यांनी कीटकनाशक प्राशन केले. मामाने कीटकनाशक प्यायल्याचे पाहून घाबरलेला भाचा मनोजने जवळच असलेल्या विहिरीत उडी मारली.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य कान्हा खंडागळे यांनी घटनास्थळी जाऊन नवनाथ खंडागळे यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर इतरांनी विहिरीतील भाचा मनोज याचा शोध सुरू केला. मात्र, अंधार पडल्याने त्याचा शोध लागला नाही. आज सकाळी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. दरम्यान नवनाथ खंडागळे यांच्यावर येथील रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.