Lockdown : आता मुंबईत घराबाहेर पडणार्‍यांची ‘खैर’ नाही! कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. विशेषतः पुणे आणि मुंबईत कोरोना बाधितांची आकडेवारी सर्वात जास्त आहे. मुंबईत करोनाबाधितांचा आकडा एक हजारांवर गेल्यानंतरही अनेक भागांत नागरिकांचा मुक्तसंचार सुरूच आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी घेतली असून विनाकारण फिरणार्‍यांची अजिबात गय करू नका, असे आदेश त्यांनी पोलीस दलाला दिले आहेत. अशा बेशिस्तांना काठीचा चोप मिळेलच; पण त्यांची वाहनेही जप्त केली जातील, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

लॉकडाउन केल्यानंतर नागरिकांनी घरात बसणे अपेक्षित आहे. मात्र, कारण नसतानाही नागरिक बाहेर भटकंती करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाचा वेग वाढला आहे. मुंबईत जे 381 कोरोनाग्रस्त विभाग ठरविण्यात आले होते, तेथे पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे. परंतु अन्य ठिकाणी लोन पसरू नये, यासाठी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. पालिकेनेही भाजीपाला बाजार पूर्णपणे बंद केले असून धान्याची दुकाने विशिष्ट दिवशी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वेळी विनाकारण रस्त्यावर येणार्‍यांची आता गय केली जाणार नाही. पोलिसांचा दंडुका खावा लागेलच. शिवाय अशा नागरिकांची वाहनेही जप्त केली जातील आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली जाईल, असे सिंग यांनी सांगितले. नागरिकांनी आवश्यकता नसताना रस्त्यावर येऊ नये. तुम्हाला काही गरज लागली तर नियंत्रण कक्षाला माहिती द्या, मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर किंवा मला वैयक्तिक संदेश पाठवा. तुमची गैरसोय दूर केली असेही सिंग यांनी सांगितले.