अहो आश्चर्यम्… पोलिसांचे भांडण, अन् सोडवायला जनता

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन

आतापर्यंत तुम्ही जनतेचे भांडण मिटवायला पोलिसांनी मध्यस्ती केल्याचे ऐकले आणि पहिले असेल, मात्र भिवंडीमध्ये मात्र याउलट झाले आहे. जमाव नियंत्रण करण्यासाठी आलेल्या पोलिसांमध्येच वादावादी झाल्याची घटना चव्हाट्यावर आली आहे. भिवंडी शहरात भंडारी कंपाऊंड परिसरात हा प्रकार घडला असून या भांडणाचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे.

भिवंडी शहरात एका ठिकाणी मोठा जमाव पाहून नारपोलीच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मदतीसाठी भोईवाडा पोलिस ठाण्यात संपर्क साधला आणि पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी येण्यास सांगितले. मात्र या दोन्ही पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी जमावावर नियंत्रण करण्याऐवजी आपसात वादावादी घालत, अरेवारी करण्यास सुरवात केली. यावेळी काही नागरिकांनी या दोन पोलिसांमधील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र दोन्ही पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ही वादावादी नेमकी का झाली हे मात्र समजलेले नाही. पोलीस ठाण्याच्या हद्दीवरून भांडण झाल्याचे बोलले जात आहे,परंतु याला दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, पोलिसांची वादावादी सुरु असताना कुणीतरी याचा विडिओ बनवला आणि तो समाज माध्यमामध्ये व्हायरल केला. सध्या हा विडिओ सगळीकडे चर्चेचा विषय बनला असून पोलिसांनीच वाद घातल्याने याबद्दल कोणी चेष्ठा करत आहेत , तर कोणी गंभीर बाब असल्याची बोलले जात आहे त्यामुळे या घटनेबद्दल संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.