‘मातोश्री’कडे राजीनामा देण्यासाठी निघालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखले
उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार रवी गायकवाड यांना तिकीट नाकारल्याने राजीनामा देण्यासाठी चार ट्रॅव्हल्सने निघालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मध्यरात्री पोलिसांनी वाटेतच अडविले. त्यांना तुळजापूर येथे रोखून परत पिटाळण्यात आले आहे. मात्र, तरीही गायकवाड समर्थकांनी इतर वाहनांतून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे.
रवी गायकवाड यांना तिकीट नाकारल्यानंतर शनिवारी उमरगा येथे मेळावा घेतला. या ठिकाणी एका समर्थकाने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या मेळाव्यात ठरल्याप्रमाणे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आपले राजीनामे देण्यासाठी व आंदोलनासाठी शनिवारी रात्री मुंबईकडे निघाले होते. बसमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी तुळजापूर येथे मध्यरात्री एक वाजता या चार बसेस अडविल्या. त्यानंतर त्यांना नोटीस बजावून परत पाठविण्यात आले. या नोटीसीत सकाळी ८ च्या आधी गाव सोडू नये, अशी सूचना देण्यात आली होती. मात्र, तरीही कार्यकर्ते इतर वाहनांची सोय करुन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
गायकवाड समर्थक रविवारी मुंबईला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राजीनामे देणार आहेत. जर त्यांची भेट झाली नाही तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन राजीनामे ठेवण्यात येणार आहे.