पोलीस शिपाई भरतीत मोठे बदल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य पोलीस दलात शिपाई पदाची भरती न करता ती पदे 8 जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने भरण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला आठवडा होत नाही तोच गृहविभागाने आता शारिरीक चाचणी पुर्वी लेखी परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सुरुवातीला लेखी परिक्षा होणार असून पात्र उमेदवारांनाच शारिरीक चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे. हा निर्णय 18 जानेवारी रोजी घेतला असून महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम 2019 मध्ये सुधारणा केलेल्या आदेशान्वये घेण्यात आल्याचे आदेश दिले आहेत.

आत्तापर्यंत झालेल्या पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत अर्ज केल्यानंतर सुरुवातीला उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व शारिरीक चाचणीसाठी बोलावण्यात येत असे, त्यामध्ये 40 टक्क्यांहून अधिक उमेदवार शारिरीक चाचणीत अपात्र ठरल्याने आपोआपच वगळले जायचे. त्यानंतर उर्वरीत उमेदवारांना लेखी परिक्षेसाठी बोलावले जायचे. मात्र, आता यामध्ये बदल करत महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम 2011 मध्ये बदल करण्यात आले आहेत. यामधील नियम 4 चे उपखंड (1), (2),(3) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार आता सुरुवातीलाच 90 मिनिटांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यामुळे आता उमेदवारांना शारिरीक चाचणी पेक्षा लेखी परिक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.