एसी खोल्यांमध्ये बसून राम मंदिरावर राजकारण होतंय : प्रकाश राज 

वृत्तसंस्था : अभिनेते प्रकाश राज बंगळूर सेंट्रल मतदारसंघातून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूका लढवणार आहेत. आपल्या सडेतोड उत्तर देण्याच्या शैलीमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले प्रकाशराज यांनी पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य केले आहे. एसी खोल्यांमध्ये बसून राम मंदिरावर सध्या राजकारण सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावरून त्यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

प्रकाश राज माध्यमांशी बोलताना म्हणाले, राम मंदिरावरुन लखनऊ आणि दिल्लीतील बंद एसी खोल्यांमध्ये बसून राजकारण होत आहे. माध्यमांतील लोकांना मी आवाहन करतो की त्यांनी अयोध्येत जाऊन तिथली परिस्थिती पहावी. अयोध्येतील गल्यांमध्ये लोक कसे जगत आहेत. भाजपा आणि मोदींना असेच राम राज्य आणायचे आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

नुकत्याच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिझोराममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांतील निकालावरुन प्रकाश राज यांनी भाजपावर निशाणा साधला होता. ट्विट करुन त्यांनी भाजपाच्या कामगिरीवर सडकून टीका केली होती.