संजय राठोड यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संजय राठोड यांनी राजीनामा दिला असला, तरी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मंजूर केल्यानंतर ते पूजा चव्हाणला न्याय देण्याच्या दिशेने पहिलं पाऊल असेल, असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. पूजा चव्हाण आत्महत्येनंतर संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरले होते. राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

अद्याप FIR दाखल झालेला नाही
चित्रा वाघ म्हणाल्या, हा फक्त पूजा चव्हाण, संजय राठोड यांचा प्रश्न नाही. महाराष्ट्राने कायमच देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. बलात्काऱ्यांना, हत्याऱ्यांना बसण्याचा अधिकार नाही. आज 18 दिवस झाले. पण अजून एफआयआर दाखल झालेला नाही. आम्ही पोलिसांची भेट घेतली. पण अजून कारवाई झालेली नाही.

पोलिसांची भूमिका संदिग्ध
पूजा चव्हाण प्रकरणात पहिल्या दिवसापासून ज्या पोलिसांची संदिग्ध भूमिका आहे, त्यांना त्या जागेवर बसण्याचा अधिकार नाही, असे चित्रा वाघ यांनी सांगितले. पोलीस एका बाजूला सांगतात, शोध सुरु आहे पण पुरावे मिळत नाहीत, अशा अकार्यक्षम पोलिसांना खात्यामध्ये राहण्याचा अधिकार नसल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.