…म्हणुन ‘हिवरेबाजार’चा ‘गड’ जिंकणार्‍या पोपटराव पवारांची सरपंच पदाची संधी हुकली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन

आदर्शगाव हिवरेबाजार येथे तब्बल 30 वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक झाली. या निवडणुकीत पोपटराव पवार यांच्या पॅनेलने स्पष्ट बहुमत मिळवले. त्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. हिवरेबाजारच्या सरपंच पदाचे आरक्षण निघाले असून सरपंचपद महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे ग्रामविकासाचे प्रवर्तक पोपटराव पवार यांची सरपंचपदाची संधी हुकली आहे. त्यामुळे त्यांना उपसरपंचपद दिले जाण्याची शक्यता आहे. हिवरेबाजार येथे सलग चौथ्यांदा सरपंचपद आरक्षित झाले आहे.
यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधीच सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत करण्यात येत होती. त्यामुळे निवडणूक लढविताना तो विचार करून उमेदवार उभा केला जात होता. मात्र, यंदाच्यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण ठरविण्यात आले आहे. यामुळे दिग्गजांची मोठी कोंडी झाली. त्यातच हिरवेबाजारचाही समावेश आहे. नगर तालुक्यातील गावांच्या सरपंचपादाची सोडत आज (गुरुवार) काढण्यात आली.
सरपंचपदाच्या सोडतीमध्ये हिरवेबाजारचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. या गावात पवार यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्राम विकास पॅनेलचे उमेदवार पोपटराव पवार, विमल ठाणगे, विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादिर, रोहिदास पादिर, रंजना पवार हे विजयी झाले आहेत. यापैकी तीन महिलांपैकी एका महिलेला सरपंचपदाची संधी मिळणार आहे. तर पवार यांच्याकडे उपसरपंचपद सोपवले जाण्याची शक्यता आहे. 30 वर्षानंतर झालेल्या निवडणुकीनंतर पोपटराव पवार हे सरपंच होतील अशी अपेक्षा होती मात्र, त्यांची संधी हुकली आहे. मुख्य म्हणजे या गावातील सरपंचपद सलग चौथ्यांदा राखीव राहिले आहे.

यंदाची निवडणुक बिनविरोध करण्यास विरोध करण्यात आला. त्यामुळे हिरवे बाजार येथे 30 वर्षांनी निवडणूक घेण्यात आली. विरोधकांनी पॅनल उभा केला. मात्र, त्यांना या निवडणुकीत यश आले नाही. पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलवर गावकऱ्यांना विश्वास टाकून सर्व उमेदवार विजयी केले.  त्यामुळे सरपंचपदाकडे लक्ष लागले होते. गावकऱ्यांनी विश्वास दाखवून सत्ता दिली असली तरी पोपटराव यांना सरपंचपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे त्यांना पूर्वी प्रमाणेच कामकाज करावे लागणार आहे.