बैलगाडा शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी केंद्राची सकारात्मक भूमिका ; खा. डॉ. अमोल कोल्हे यांची माहिती

मंचर : पोलीसनामा ऑनलाइन – बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह आणि पशुसंवर्धन खात्याचे सहसचिव ओ.पी. चौधरी यांची भेट घेतली. या बैठकीत बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री गिरीराज सिंह यांनी दिल्याची माहिती डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

मागिल वर्षापासून बंद पडलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरुवारी (दि.11) केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची मागणी करणारे निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी आपल्याला चुकीची माहिती दिल्याचे सांगितले. यावर मंत्री गिरीराज यांनी या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती खासदार कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.

या बैठकीच्या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यती हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पारंपारिक खेळ असून दरवर्षी होणाऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रा उत्सवात नवसाचे बैलगाडे पळविण्याची प्रथा असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच गावागावात यात्रा-उत्सवांच्या निमित्ताने शेती अवजारांपासून ते विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची मोठी उलाढाल होते. सांस्कृतिक कार्यक्रम, वाजंत्री या सारख्या कलावंतांची उपजिवीका या यात्रा-उत्सवांवर अवलंबून असते. मात्र बैलगाडा शर्यत बंदीमुळे हा सर्व व्यापार ठप्प झाला असून व्यापारी, कलावंत व बलुतेदार यांच्या उपजिवीकेचा प्रश्न गंभीर बनला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, केवळ शर्यतींसाठी वापरण्यात येणारा खिलार बैल सांभाळणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. परिणामी या बैलाची कमी दराने बेकायदा कत्तलीसाठी रवानगी केली जाते. त्यामुळे खिलार जातीच्या बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून भविष्यात ही देशी बैलांची जात नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे खिलार जातीच्या देशी बैलांचा वंश वाचवण्यासाठी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवणे गरजेचे आहे. त्यासाठी बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची गरज असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

पशुसंवर्धन मंत्र्यांनी खासदार डॉ. कोल्हे यांची भूमिका समजून घेत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत पशुसंवर्धन मंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असून ही बंदी उठेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.