1000 रुपये गुंतविण्याचे फायदे अनेक, पोस्टाची आणखी एक ‘स्कीम’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोक रात्रदिवस कष्ट पैसे कमवतात बचत करत असतात. हि बचत खासगी, सरकारी बँका तसेच भिशी यांसारख्या योजनांनमध्ये गुंतवणूक करतात. मात्र, पीएनबी घोटाळ्यासारखे फ्रॉड पाहता आपला पैसा सुरक्षित आहे का, असा प्रश्न सरकारी बँकांमध्येही पैसे ठेवणाऱ्यांना पडतो. खासगी, सहकारी बँका कधी बुडतील याचा नेम नाही. त्यात सरकारी बँकांमध्येही हजारो कोटींचे घोटाळे होतात. यामुळे जास्त व्याज नको पण आमचे पैसे सुरक्षित ठेवा असे म्हणण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.

सध्या पोस्ट खात गुंतवणुकीच्या बाबतीत सुरक्षित मानलं जात. त्यामुळे कमी व्याज मिळत असलं तरी लोक पोस्टामध्ये पैसे ठेवू लागले आहेत. या लोकांसाठी पोस्टाची ही स्कीम जबरदस्त आहे. या स्कीममध्ये पैसे सुरक्षित राहण्याबरोबरच व्याजदेखील इतर बँकांच्या तुलनेत जास्त मिळते.

भारतीय आणि पोस्ट ऑफिस यांच्यातील नाते हे विश्वासाचे आहे. जर तुम्ही 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी Post Office Monthly Income Scheme (POMIS) एक चांगला पर्याय आहे.या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक उत्पन्ना मिळणार आहे. तसेच तुमचा पैसादेखील सुरक्षित राहणार आहे.

पोस्ट ऑफिसची मंथली सेव्हिंग स्कीम (MIS) मध्ये एका खात्यातून कमीतकमी 1000 रुपये आणि जास्तीतजास्त ४.५ लाख रुपये गुंतवू शकता. जॉईंट खात्यामध्ये ही सीमा 9 लाख रुपये आहे. म्हणजेच पती-पत्नी जॉईंट खात्यामध्ये ९ लाख रुपये गुंतवू शकतात. ही योजना रिटाय़र कर्मचारी आणि वरिष्ठ नागरिकांसाठी खूप फायद्य़ाची आहे.

एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलाच्या नावे देखील पैसे गुंतवू शकता. यासाठी जास्तीतजास्त ३ लाख रुपये गुंतविता येणार आहेत. या योजनेसाठी पोस्टात एक वेगळा POMIS फॉर्म भरावा लागतो. या योजनेसाठी ग्राहकाला पोस्टात एक बचत खाते उघडावे लागते. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत (POMIS) सध्या ६.६ टक्के वार्षिक व्याज मिळते. जे अन्य एफडी किंवा इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा खूप चांगले आहे.
POMIS चा फॉर्म भरताना तुम्हाला ओळखपत्र, रहिवासी पुरावा, २ पासपोर्ट साईजचे फोटो लागणार आहेत. तसेच एका नॉमिनीची देखील गरज लागते.

या योजनेचा अवधी पाच वर्षांचा आहे. जर त्या आधी तुम्ही पैसे काढले तर नुकसान होण्याची शक्यता आहे. एका वर्षाच्या आत तुम्ही पैसे काढू शकत नाही. तर दुसऱ्या वर्षी गुंतवलेले पैसे काढायचे असल्यास २ टक्के रक्कम दंड म्हणून आकारली जाते. ३ ते ५ वर्षे अवधीत काढल्यास १ टक्के रक्कम दंड म्हणून कापली जाते.

खात्याचे फायदे….
एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्टात हे अकाऊंट तुम्ही शिफ्ट करू शकता. ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुन्हा ती रक्कम गुंतवू शकता. काही विपरित घडल्यास यामध्ये नॉमिनी देता येत असल्य़ाने कुटुंबाचा पुढील त्रास वाचतो. एमआयएस योजनेतून टीडीएस कापला जात नाही, परंतू व्याजावर कर द्यावा लागतो.