काश्मीरमध्ये 70 दिवसानंतर वाजली 40 लाख फोनची घंटी, पोस्टपेड सेवा सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये मागील दोन महिन्यांपासून बंद असलेल्या मोबाईल सेवा अखेर सुरु करण्याचा निर्णय घेतला. मुख्य सचिव रोहित कंसल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. आजपासून येथील पोस्टपेड मोबाईल सेवा सुरु करण्यात आली असून इंटरनेट सुविधांसाठी मात्र नागरिकांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

मागील दोन महिन्यांपासून या ठिकाणी फोन आणि मोबाईल सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे देशभरात असलेल्या नातेवाईकांना आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी संपर्क साधता येत नव्हता. मात्र आता सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाच ऑगस्टपासून या ठिकाणी मोबाईल आणि फोनची सेवा बंद ठेवण्यात आली होती. पोस्टपेड सेवा सुरु करण्यात आली असून इंटरनेट आणि प्रीपेड सेवांच्या बाबतीत नंतर निर्णय घेण्यात यावर असल्याची माहिती सचिवांनी दिली आहे.

5 ऑगस्टपासून इंटरनेट बंद
मोबाईल सेवा सुरु करण्यात आली असून अद्याप इंटरनेट सेवांवर कोणतेही भाष्य करण्यात आले नसून 5 ऑगस्टपासून येथील सेवा बंद आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला केवळ बीएसएनएल पोस्ट-पेड सेवाच सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर सर्वच कंपन्यांच्या सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोबाईल फोन सुरु करण्याची मागणी
पर्यटन क्षेत्रात असणाऱ्या स्थानिकांनी मोबाईल सेवा सुरु करण्याची मागणी केली आहे. मोबाईल सेवा सुरु नसल्याने त्यांना बुकिंग घेता येत नाहीत तसेच ग्राहकांशी देखील त्यांना संपर्क साधता येत नाही. या सेवांबरोबरच ऑगस्टमध्ये देण्यात आलेले आदेश देखील मागे घेण्यात आले असून आता पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाऊ शकतात.

 

Visit : Policenama.com